India Pakistan Ceasefire: ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळे घाबरलेल्या पाकिस्तानने जगातील देशांना भारतासोबत शांतता आणि सलोख्याचे आवाहन केले होते. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trumph) यांनी ट्रुथ सोशलवरील पोस्टद्वारे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीचा दावा केला.
ट्रम्प यांच्या या विधानाला भारत सरकारच्या उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला आहे. तथापि, भारत सरकारने स्पष्ट केले की भारत आणि पाकिस्तानमधील गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय थेट दोन्ही देशांमधील चर्चेतून घेण्यात आला होता.
परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, शनिवारी (१० मे २०२५) दुपारी पाकिस्तानच्या डीजीएमओने फोन करून पुढाकार घेतला, त्यानंतर चर्चा झाली आणि एकमत झाले. त्यांनी सांगितले की, इतर कोणत्याही ठिकाणी इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. ते म्हणाले, “पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज १५:३५ वाजता भारतीय डीजीएमओंना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ५:०० वाजल्यापासून जमीन, हवाई आणि समुद्रावर सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवावी यावर त्यांनी सहमती दर्शवली. आज दोन्ही बाजूंना या कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लष्करी ऑपरेशन्स महासंचालक १२ मे रोजी दुपारी १२:०० वाजता पुन्हा चर्चा करतील.”
ट्रम्प यांनी करारात मध्यस्थी केल्याचा दावा केला होता
यापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा करार झाल्याचा दावा केला होता. ते म्हणाले, “अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ वाटाघाटींनंतर, मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांचे अभिनंदन. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.”
— Donald J. Trump (@realDonaldTrump) May 10, 2025
पाकिस्ताननेही युद्धबंदीची पुष्टी केली
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी एक्स वर पोस्ट केले आहे की पाकिस्तान आणि भारत यांनी तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. तथापि, भारतावर हल्ला करण्याच्या अयशस्वी प्रयत्नांबद्दल त्यांनी माफी मागितली नाही. त्यांनी पुढे असा दावा केला की पाकिस्तानने नेहमीच आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत.