ऑफिसला या… नको चहा.. आता गुळ – पाणी प्या….!!

लातूर दि.27 (जिमाका) : बदलत्या जीवन शैलीत आहारात मोठ्या प्रमाणात बदल झाले… जंक फूडच्या जमान्यात… शरीरात मोठ्या प्रमाणात रासायनिक घटक जात असल्यामुळे वाढते पित्तदोष हे आजच्या धावपळीच्या जीवनात वारंवार होणारा विकार होऊन बसला आहे. यात चहाचे वाढते सेवन हे या विकाराला बळ देत आहे. हे लक्षात घेऊन आज पासून जिल्हा माहिती कार्यालयात ‘नको चहा.. आता गुळ पाणी प्या’ असा पाहुणचार होणार आहे.

जिल्हा माहिती कार्यालय हे प्रसार माध्यमातील लोकांचा राबता असलेलं शासकीय कार्यालय….प्रसार माध्यमं हे ओपिनियन लीडर आहेत… आज पर्यंतच्या बदलाचे सर्वात मोठे हक्कदार माध्यम आहेत… त्यामुळे नवीन सुरुवात गुळ पाणी सुरु करत आहोत.

वारंवार शरीरात कॅफीन घालून पित्तदोष ( एका कपात 10 मिली ग्रॅम एवढे कॅफीन असते ) वाढविण्यापेक्षा आता शरीराला पोषक असलेला सेंद्रिय गुळ, तांब्याच्या भांड्यातले वाळे घातलेले पिण्याचे पाणी हा जुन्या काळातला नवा पाहुणचार या कार्यालयात सुरु करत आहोत.

जुन्या काळात पिण्याचे पाणी फक्त तांब्याच्या भांड्यातून पीत असत म्हणून पाणी पिण्याच्या भांड्याचे नावच तांब्या पडले. गुळ पाणी तर आता आता पर्यंत पाहूणचाराची पद्दत आपल्याकडे होती.

त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हे गुळ, तांब्याच्या भांड्यातले पाणी आणि वाळा ही अत्यंत गुणकारी वनस्पती असलेले पाणी आम्ही सुरु केले आहे.