श्वास कुठून घ्यायचा हेपण तुम्हीच ठरवणार? वंदे मातरमच्या निर्णयावरुन वादंग

मुंबई – खाते वाटपानंतर भाजपचे फायरब्रँड नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. शासकीय कार्यालयामध्ये आता हॅलो ऐवजी आता वंदे मातरम (Vande Mataram) असं म्हणण्याचा निर्णय सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. आमच्या सर्वांसाठी वंदे मातरम हे उत्साह वाढवणारे शब्द आहेत. वंदे मातरम हे पद्य नाही, गीत नाही हे ऊर्जा वाढवणारे शब्द असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

यावर आता माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी सुधीर मुनगंटीवारांवर टीका केली आहे. तसेच आव्हाडांनी, बोलायला सुरुवात कशानं करावी हे तुम्ही शिकवणार का? असा खडा सवालच मुनगंटीवार यांना केला आहे. तसेच राज्यात आता सामान्यांवर बोलण्यावर अशी जोरजबरदस्ती करू नका असेही त्यांनी म्हटलं आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले ते मोकळा श्वास घेण्यासाठी, तो श्वास कुठून कसा घ्यावा, हेही तुम्हीच ठरवणार का?”, अशी जोरजबरदस्ती करू नका, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत संताप करत म्हटले की, भारतीय संस्कारांत नमस्कार आहे, अनेक जण जय भीम म्हणतात. पोलीस अधिकारी जय हिंद म्हणतात, कोणी सतश्रीअकाल म्हणेल. भारतात स्वातंत्र्य आहे, लोकांना मोकळा श्वास घेऊ द्या, आता तोसुद्धा तुम्हाला विचारुन घ्यायचा का, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.