“मी ना शिवसैनिक, ना राजकारणी तरीही…”, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर किरण मानेंची भावूक पोस्ट

मुंबई – उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राज्याभिषेकाचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे राज्यात भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राजीनाम्यानंतर भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेवर अभिनेता किरण मानेंनी भाष्य केलं आहे.

किरण माने यांची फेसबूक पोस्ट

उद्धवजी, एकच शब्द : ‘ग्रेसफुल’ !

सत्यघटना सांगतो. सातार्‍याजवळ खिंडवाडी नांवाचं एक छोटं गांव आहे. तिथं एका मित्राकडं काल मी जेवायला गेलो होतो. एकतर गांव लै छोटं. त्यात गांवापास्नं लांब शेतात एकाकी असलेलं घर. गांवाकडची साधी मान्सं. राजकारणाशी-कुठल्या पक्षाशी काडीचाबी संबंध नाय. पोटापुरतं कमावणे आणि हातातोंडाशी गाठ घालणे यापलीकडं दुनियादारीशी संबंध नाय. लै दिसातनं जमीनीवर मांडी ठोकून जेवायला बसलो, आन् ‘ती’ बातमी दिसली…

…कुनाचा विश्वास बसनार नाय, पन तुम्ही राजीनामा दिलात हे कळल्यावर, त्या घरातला एकेक मानूस हळहळला. च् च् च् च् असे आवाज आले. काहीजनांच्या डोळ्यांत पानी आलेलं मी काल माझ्या डोळ्यांनी बघितलं. घरातल्या तरन्या लोकांपास्नं म्हातार्‍यांपर्यन्त प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य होतं ‘चांगला मानूस व्हता’ !

उद्धवजी, खरं सांगू? मला लै आनंद झाला. का ते नंतर सांगतो.. पन तुमच्या आयुष्यात जे घडलं, ते नविन नाय. राजकारनात तर ‘काॅमन’ गोष्ट हाय. खर्‍या आयुष्यात गरीब असो वा श्रीमंत… सामान्य मानूस असो वा सेलिब्रिटी..त्याच्या त्याच्या पातळीवर पराभवाचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. विश्वासघाताचं दु:खबी सगळ्यांना पचवावं लागतं. पन अशावेळी लै कमी लोक तुमच्यासारखे ‘धीरोदात्त’ असतात ! मी म्हनत नाय की तुमची चूक नसंलच. तुमच्याकडुन चुका झाल्याबी असतील. पन तरीबी जे घडलं ते ‘मानूस’ म्हनून उद्ध्वस्त करनारं होतं. तुम्ही आतनं ‘तुटला’ नसाल का हो? काळजाला घरं पडली नसतील का?? जी मान्सं तुमच्या पक्षानं शून्यातनं वर आनली.. त्या मान्सांबरोबरचे सुरूवातीपासूनचे कित्येक आनंदा-दु:खाचे क्षण तुमच्या डोळ्यांसमोर तरळले नसतील का???

कुनी म्हनंल, ‘ही राजकारनी लोकं लै पोचलेली असत्यात. सगळे सारखेच.’ हे बी मान्य. तुमी लोक धुतल्या तांदळासारखे नसता. तरीबी मी फक्त ‘मानूस’ म्हनून विचार करतोय. मी स्वत: यातनं गेलोय. जवळच्यांनी पाठीत खंजीर खुपसल्यावर वेदना होतातच. काळीज तुटतंच. तरीबी ज्या संयमानं, उद्वेग-चिडचिड न करता, तारस्वरात न किंचाळता, शांतपने पद सोडलंत, ती वृत्ती ‘आजकाल’ लै दूरापास्त झालीय.

मला आनंद याचा झालाय की तुमी आता लै लै लै भाग्यवान आहात. सहजासहजी कुनाला मिळनार नाय, आज एकाबी नेत्याकडं नसंल अशी एक गोष्ट तुमच्याकडं हाय… कुठली? आता तुमच्याजवळ जे उरलेत ते अत्यंत नि:स्वार्थी, निष्ठावान, शुद्ध – स्वच्छ मनाचे कार्यकर्ते आहेत. भले संख्या कमी असेल, पन जे आहेत ते मनाच्या तळापास्नं ‘तुमचे’ आहेत. जितक्या नि:स्वार्थीपने तुमच्यासोबत रश्मीजी आणि आदित्य आहेत, तितक्याच नितळ भावनेनं आता उरलेले सगळे शिवसैनिकबी तुमचे आहेत. गाळ बाजूला गेला, आता शंभर टक्के ‘प्यूअर’ असलेला एकेक माणूस तुमच्यासोबत आहे. नशीबवान आहात !

तुम्हाला राखेतनं झेप घ्यायचीय.. शून्यातनं विश्व उभं करायचंय.. हे लिहीनारा मी ना शिवसैनिक, ना राजकारनी. तुमी आयुष्यात कुठली मदतबी मला केलेली नाय आनि मी ती अपेक्षा बी कधी ठेवली नाय. तरीबी मला तुमच्याबद्दल आज हे वाटतंय, ही तुमची ‘ॲचिव्हमेन्ट’ आहे !

लब्यू उद्धवजी.