टोलमुक्तीच्या एकाच मुद्द्यामुळे कोल्हापूरकर भाजपाला मतदान करतील

कोल्हापूर – कोल्हापूरच्या जनतेला ३० वर्षे टोलचा त्रास सहन करावा लागणार होता. माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना, क्षणाचाही विलंब न करता टोलमुक्तीसाठी ४७३ कोटी रुपये निधी मंजूर करुन कोल्हापूरकर जनतेला दिलासा दिला. त्यामुळे टोलमुक्तीच्या एकाच मुद्द्यावर उत्तर कोल्हापूरकर भाजपाला मतदान करतील, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोट निवडणुकीत (kolhapur north election) भाजपा उमेदवार सत्यजित कदम (satyajeet kadam) यांच्या प्रचारार्थ शहर भाजपाच्या वतीने कोल्हापूर मधील रंकाळा तलाव (Rankala) परिसरात चाय पे चर्चाचे आयोजन केले होते. यामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेऊन, मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला.यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, सुहास आण्णा लटोरे, सुदर्शन पाटील, प्रताप देसाई, किरण नकाते उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, कोल्हापूर मध्ये टोलचा प्रश्न अतिशय त्रासदायक ठरला होता. विद्यमान पालकमंत्री त्याकाळी हा प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त आंदोलन करुन दिशाभूल करत होते. पण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना, क्षणाचाही विलंब न करता, ४७३ कोटी रुपये निधी मंजूर करुन, टोलच्या त्रासापासून कोल्हापुरकरांना मुक्त केले. त्यामुळे टोलमुक्तीच्या एकाच मुद्द्यावर कोल्हापूरकर जनता भाजपाला नक्कीच मतदान करतील.

ते पुढे म्हणाले की, सत्यजितनाना कदम हे कोल्हापूरच्या राजकारण आणि समाजकारणातील अतिशय जुनं घराणं आहे. त्यांचे वडील शिवाजीराव कदम यांनी महापौर म्हणूनही कोल्हापूरकरांची सेवा केली आहे. त्यामुळे सत्यजितनाना कदम हे देखील सामाजिक कामामुळे जनतेशी जोडले गेलेले आहेत.

माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले की, ज्याप्रमाणे आपण आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे उत्तर कोल्हापूरकर जनतेने शहराच्या काळजीसाठी भाजपाच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे. २०१९ च्या महापुरानंतर माननीय देवेंद्रजी आणि दादांमुळे नुकसानभरपाईचे पैसे तातडीने मिळाले. पण २०२१ च्या महापुरातील नुकसानीचे पैसे अजूनही कोल्हापूरकरांना मिळाले नाहीत. काही शेतकऱ्यांचे तर प्रचंड नुकसान झाले. पण त्यांना नुकसान भरपाई म्हणून हेक्टरी १३५, ११६ रुपये देऊन, क्रूर थट्टा केली आहे. त्यामुळे उत्तर कोल्हापूर मधील जनता पोटनिवडणुकीत विरोधकांना त्यांची योग्य जागा दाखवून देतील.

दरम्यान, यावेळी आ. पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांनी चाय पे चर्चा कार्यक्रमानंतर आरोग्यवर्धक काढ्याचे वाटप करुन, आस्वाद ही घेतला.