अमरावती | ( Eknath Shinde) हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सांगायचे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. त्याप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते लोकांच्या दारात काम करत आहेत. लोक काम करणाऱ्याला निवडून देतात, घरात बसणाऱ्याला नाही मात्र आता नेते युरोपात आणि कार्यकर्ते कोमात, अशी उबाठाची अवस्था झाल्याची घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. अमरावती येथे आयोजित शिवसेना पक्ष मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी मंचावर शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, मंत्री उदय सामंत, मंत्री संजय राठोड, मंत्री संजय शिरसाट, मंत्री आशिष जैयस्वाल, कॅप्टन अभिजित अडसूळ आणि अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे माजी आमदार संजय बंड यांच्या पत्नी प्रीती संजय बंड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत धनंजय बंड, उबाठा तालुकाप्रमुख सुनील डीके, गोपाळ लांजूरकर, सतीश काळे, अमोल पहिले, सागर बहुतकर, पंकज रेगे, योगेश गुंदे, गजानन पाटील, पिट्टू अनासने, सागर घोडे, तुकाराम चांदेकर, यांच्यासह उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संजय बंड बाळासाहेबांचा कडवट कार्यकर्ता होता. अमरावतीत शिवसेना मोठी करण्यात संजयने जीवाचे रान केले. बाळासाहेब शिवसैनिकांना सवंगडी समजायचे. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. इथ कोणी मालक आणि नोकर नाही. सर्वांना काम करण्याची संधी आहे. जो काम करेल तो पुढे जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बंड म्हणजे उठाव, भगवत गीतेत श्रीकृष्णाने म्हटलंय जे स्वाभिमानी असतात ते बंड करतात, जेव्हा अन्याय झाला तेव्हा कसलाही विचार केला नाही. शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला आणि लोकांच्या मनातले सरकार आणले. सत्तेसाठी कुणासमोर तडजोड केली नाही. सत्ता येईल आणि जाईल पण नाव गेलं तर पुन्हा येत नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी खुर्चीसाठी हपापलेलो नाही. आपल्याला खुर्चीचा मोह नाही, मात्र ज्या लोकांनी खुर्चीत बसवले त्यांचे प्रश्न सोडवायचे आहेत, अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली.
विरोधकांनी लाडकी बहिण योजनेला बदनाम केले. मात्र निवडणुकीत लाडक्या बहिणींनी विरोधकांना जोडा दाखवला. महायुतीला विक्रमी मतदान करुन सत्ता दिली. त्यामुळे लाडकी योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
राज्यात शासन आपल्या दारीसारख्या उपक्रमातून लोकांच्या दारी मंत्रालय नेले आणि त्यांचे प्रश्न सोडवले. शिवसेनेची नाळ सर्वसामान्यांशी जुळलेली आहे. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार पुढे घेऊन जातोय. त्यामुळेच ६० आमदारांना निवडून देत लोकांनी खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब केले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. ऑपरेशन सिंदूरबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय लष्कराचे यावेळी जाहीर अभिनंदन केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडली! भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमने 50 ड्रोन्स पाडले
ज्याने पाकिस्तानला सळो की पळो केलं ते एस-400 सिस्टीम नक्की आहे तरी काय?
धरणही उद्ध्वस्त! सर्जिकल स्ट्राइकनंतर भारताची पाकिस्तानला दुसरी जोरदार चपराक