विधान परिषद निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करु – नाना पटोले

मुंबई – विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांचा उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. काँग्रेसचे विधान परिषद सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर होत असलेली निवडणूक बिनविरोध व्हावी अशी काँग्रेसची अपेक्षा आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करु मात्र निवडणूक झाली तरी काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना नेते व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, सोनल पटेल, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. झिशान सिद्दीकी, आ. अमित झनक, आ. राजेश राठोड, राष्ट्रवादीचे आ. बबनदादा शिंदे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, प्रमोद मोरे आदी उपस्थित होते.