तुम्ही तिघांनी मिळून अडीच वर्षं मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण.., देवेंद्र फडणवीसांचं खळबळजनक विधान!

Mumbai – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील गळती थांबताना दिसत नाही. यातच शिंदे गटाला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर प्रथमच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गोरेगाव येथे गटप्रमुखांच्या मेळाव्याला जाहीररित्या संबोधित केले.आपल्या भाषणातून त्यांनी भाजप, मनसे, शिंदे गट यासह संघावर देखील टीका केली.

दरम्यान, ठाकरे यांच्या या टीकेला आता विरोधकांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कालचे भाषण हे निराशेचं भाषण होतं. त्यांनी नैराश्येतून वक्तव्य केलं असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. तुम्ही आमच्यासोबत निवडणूक लढवून आमच्याच पाठित खंजीर खुपसला, तुमच्यात हिंमत होती तर त्यावेळीच तुम्ही का राजीनामे दिले नाहीत? असा सवाल फडणवीस यांनी केला.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अडीच वर्षात मला ते संपवू शकले नाहीत. यापुढेही तुम्ही मला संपवू शकणार नसल्याचे फडणवीस म्हणाले. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत निवडून आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत मोदीजींचा फोटो लावून निवडणूक लढवली होती असेही ते म्हणाले. आम्ही लिगली निवडून आलो आहोत. मात्र, तुम्ही आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचे फडणवीस म्हणाले. तेव्हा का राजीनामे दिले नाहीत असा सवाल त्यांनी केला.