महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र अभिमानींचा १७ डिसेंबरला मुंबईत भव्य मोर्चा; अजित पवार यांची माहिती

मुंबई – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महापुरुषांचा घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून सातत्याने होत असलेला अवमान, सीमाभागातील गावांकडून महाराष्ट्राबाहेर जाण्याची इतिहासात पहिल्यांदाच होत असलेली मागणी, मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर पळवल्याने होत असलेलं नुकसान, वाढती महागाई, बेरोजगारी, संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेलं अपयश, अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरलं असून महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, महाराष्ट्राच्या हितांचे रक्षण या सरकारकडून होऊ शकलेलं नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची धमक या सरकारमध्ये नाही. अशा नेभळट सरकार विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्रप्रेमी नागरिकांच्यावतीने येत्या १७ डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान या मोर्चात सर्व महाराष्ट्र अभिमानी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर पत्रकारांची संवाद साधताना अजित पवार यांनी राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारच्या अपयशावर कडाडून हल्ला चढवला.

राज्याच्या सीमाभागातील गावांनी महाराष्ट्राबाहेर जाण्याची मागणी करावी, असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. यामागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. घटनात्मक पदांवरील व्यक्तींनी महापुरुषांचा अवमान करण्याचे दूस्साहस यापूर्वी कधीही केले नव्हते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यापूर्वी कधीही हतबल दिसला नव्हता. राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊनही, माध्यमांमध्ये तसे जाहीर करूनही राज्याचे दोन मंत्री मराठी भाषिक बेळगावमध्ये जाऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावमध्ये बंदी कशी होऊ शकते आणि महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते हेच समजत नाही, असेही अजित पवार म्हणाले.

महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मोर्चाआधी राज्यपालांना पदावरून हटवले तरीही हा मोर्चा निघेलच, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. नांदेडमधील देगलूर, सांगलीतील जत, सोलापुरातील अक्कलकोट, गुजरात सीमेलगतच्या नंदुरबार जिल्ह्यातील तसेच अन्य गावांसाठी महाविकास आघाडी सरकारने अनेक विकासकामे जाहीर करून त्यासाठी निधीही उपलब्ध केला होता. त्या कामांना स्थगिती देण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केले असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी तसेच राज्यातील विविध संस्था संघटनांनीही १७ डिसेंबरच्या मोर्चाला आपले समर्थन दिले असल्याची माहिती ही अजित पवार यांनी यावेळी दिली.