महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे झाली मात्र अद्याप अनेकांना डायजेस्ट होत नाही – भुजबळ  

पुणे :- माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सर्व प्रथम मंडल आयोग लागू करण्यात आला. त्यातून महाराष्ट्रात विविध क्षेत्रात ओबीसींचे आरक्षण आपल्याला मिळाले. मात्र केंद्र सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे हे आरक्षण धोक्यात आले आहे. आरक्षण पूर्ववत करण्यासाठी जनगणनेची आवश्यकता आहे. कोरोनामुळे केंद्र सरकार २०२१ ची जनगणना सुरू करत नाही. मात्र महाराष्ट्र सरकारला करण्याचा आग्रह धरत आहे. सरकारने ही जनगणना होईपर्यंत आरक्षण पूर्ववत सुरू ठेवावे अशी मागणी करत ओबीसींचे राजकीय आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले. तसेच या कार्यक्रम प्रसंगी त्यांनी ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे असा ठराव पारित केला.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिला जाणारा ‘समता पुरस्कार’ यावर्षी छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या पुरस्करामध्ये रुपये एक लक्ष, फुले पगडी, मानपत्र शाल आणि स्मृतीचिन्ह यांचा समावेश आहे.

यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, मध्यप्रदेश सतनाचे आमदार सिद्धार्थ कुशवाह, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार पंकज भुजबळ, कमलताई ढोले पाटील, जयदेव गायकवाड, दिप्ती चौधरी,बापूसाहेब भुजबळ, प्रा.हरी नरके, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मंजिरी धाडगे, मनीषा लडकत, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सुनील सरदार, डॉ.रत्नाकर लाल, पुणे विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, प्रा.दिवाकर गमे, ऍड.सुभाष राऊत, पुणे शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर, वैष्णवी सातव, अविनाश चौरे,मनीषा लडकत, आंबदास गरूडकर, यांच्यासह पदाधिकारी व समता सैनिक उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, छत्तीसगढ राज्यात बहुजन समाजातील नेतृत्व भूपेश बघेल यांच्या रूपाने मुख्यमंत्री पदावर काम करत आहे. त्यामुळे गोर गरिबांचे कामे होत असल्याचे लोकांसाठी जे लढतात ते चिरकाल स्मरणात राहतात त्यामुळे तुमचं नेतृत्व तुम्हीच निर्माण करा असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्षे पूर्ण झाले आहे. मात्र काही लोकांना अद्यापही ‘डायजेस्ट’होत नसल्याची टीका करत सोनिया गांधी, शरदचंद्र पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार काम करत आहे. हे सरकार आपले पाच वर्षे पूर्ण करेल आणि पुन्हा एकदा येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ते म्हणाले पुढे की, फुले, शाहू, आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळाले. ज्यांनी आपले आयुष्य आपल्या सर्वांच्या न्याय हक्कासाठी व्यथित केले त्यांना आपण विसरता कामा नये. सगळीकडे महात्मा फुले व सावित्रीबाई यांचे पुतळे उभारण्यात यावे छत्रपती शाहू, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांचे कार्यक्रम घ्यावेत असे आवाहन त्यांनी केले. तसेच गल्ली गल्लीतून फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावाचा नारा दिला जावा. देशातील शेतकऱ्यांसाठी लढले पाहिजे. आपल्या न्याय हक्कासाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर वर्षभर लढा दिला. या शेतकऱ्यांच्या लढ्यापुढे मोदी सरकारला झुकावे लागले आहे. शेतकऱ्यांसाठी हा लढा लढण्यासाठी आपण पुढे न्यायला पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

ते म्हणाले की, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद देशभरात काम करत असून देशभरात आरक्षणाची लढाई लढली जात आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सावित्रीबाईंचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येत असून तीन जानेवारी रोजी हा पुतळा विद्यापीठात बसविण्यात येणार आहे. तसेच महात्मा फुले वाडा आणि सावित्रीबाई फुले यांचे स्मारक एकत्र जोडले जाणार असून भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले आद्य मुलींची शाळा सुरु करण्यात येईल. पुतळे उभे करण्यासोबतच त्यांच्या विचारांची कामे प्रत्यक्षात उभे करून त्यांची खरी स्मारक उभी करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.