काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करणं, काँग्रेसमुक्त भारत करणे ही आता धार्मिक क्षेत्राची जबाबदारी – भोसले  

मुंबई – सांगलीत (Sangli) चोर समजून साधूंना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या जत (Jath) तालुक्यातील लवंगा गावात हा सर्व प्रकार घडला. मुलं पळवणारी तसेच चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पालघर प्रकरणाची पुनरावृत्ती थोडक्यात टळली.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चारही साधू उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) रहिवाशी असून ते कर्नाटकात देवदर्शनासाठी जात होते. येथील स्थानिक लोकांना त्यांची भाषा समजू शकली नाही, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर संशय बळावला. मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून गावकऱ्यांनी चारही साधूंना मारहाण केली.

दरम्यान, भाजप (BJP) आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी या मुद्द्यावर भाष्य करत कॉंग्रेसवर (Congress) हल्ला चढवला आहे. ते म्हणाले, भारतात जिथे जिथे हिंदू धर्मावर अन्याय-अत्याचार होतो तिथे तिथे त्याचा थेट संबंध हा काँग्रेस पक्षासोबत असतो. सांगलीमध्ये साधूंना झालेल्या मानहाणीत सुद्धा काँग्रेसचेच कार्यकर्ते सहभागी होते आणि त्यांनीच या साधूंना मारहाण केली हे आता समोर आलंय.

ख्रिश्चन मिशनरीच्या आदेशावर चालणाऱ्या काँग्रेस पक्षाने भारतामध्ये हिंदू धर्मावर अन्याय सुरू केला आहे आणि म्हणून भारतात जर हिंदू धर्म सुरक्षित ठेवायचा असेल, त्याचा स्वाभिमान वाचवायचा असेल तर काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करणं, काँग्रेसमुक्त भारत (Congress free India) करणे ही आता धार्मिक क्षेत्राची जबाबदारी आहे आणि म्हणून या काँग्रेसला आता महाराष्ट्रातून हाकलावेच लागेल असं ते म्हणाले.