छत्रपती संभाजीराजेंच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष : राजकीय घडामोडींवर नेमके काय बोलणार ?

रायगड – छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) यांनी मागील महिन्यात स्वराज्य या नावाने संघटना स्थापन करीत असल्याची घोषणा केली. सोबतच ही संघटना भविष्यात राजकीय पक्ष देखील होऊ शकते, असे सूतोवाचही त्यांनी केले. यावेळी संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणूकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असल्याची घोषणा देखील केली होती. राजेंच्या या घोषणेनंतर पुढचे काही दिवस महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले होते.

त्यातच संजय राऊत (Sanjay Raut) कोल्हापूर दौऱ्यावर असताना संभाजीराजे यांचे वडील छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati Shahu Maharaj) यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत असताना केलेल्या दाव्यांमुळे अनेक चर्चा व तर्क वितर्कांना उत आला होता. मात्र या सर्व घडामोडींवर छत्रपती संभाजीराजे यांनी तूर्तास तरी मौन बाळगणेच पसंत केले होते. ते कोणत्याही जाहीर कार्यक्रमात दिसले नाहीत अथवा माध्यमांसमोरही व्यक्त झाले नाहीत.

याबाबतच्या आपल्या भावना त्यांनी दाबून ठेवल्या असल्या, तरी ६ जून रोजी किल्ले रायगडवर साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने ते या सगळ्यांवर व्यक्त होणार असल्याचे समजते.

वस्तुतः छत्रपती संभाजीराजे हे रायगडच्या राजसदरेवरून कधी राजकीय भाष्य करत नाहीत. या पार्श्वभूमीवर या सर्व घडामोडींबाबत ते नेमके कशा पद्धतीने व्यक्त होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. रायगडावरील त्यांचे भाषण नेमके काय सुचविणारे असेल, ते थेटपणे बोलतील की अप्रत्यक्षपणे टोले देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.