‘रात्रीचा पाऊस’मधून उलगडणार स्त्री मनाचा हुंकार! फिल्म फेस्टिवलमध्ये नावाजलेला सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला

स्त्रीची अस्मिता आणि मुख्य म्हणजे अस्तित्व काय असतं? हे सांगणारा चित्रपट ‘रात्रीचा पाऊस’ येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. आपण स्वतःला कितीही पुरोगामी म्हणत असलो तरी आजही अनेक गावात, अनेक घरात स्त्रीला स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत, तिच्यासाठी कोणीतरी निर्णय घेते, स्त्रीचे लैंगिक शोषण अनेक वेळा होते आणि तिला तिचा आवाजही नसतो, अशाच विषयांवर थेट प्रहार ‘रात्रीचा पाऊस’ या सिनेमात केला आहे. या सिनेमात दुःष्काळी भागातील होरपळ आणि त्यात गावातून मुंबईकडे झालेला नायिकेचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

नवोदित अभिरामी बोस यात मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबत लक्ष्मी बॉम्ब, टिकली, जॅकलीन – आय एम कमिंग अशा सिनेमात झळकलेला किरण पाटील आहे. तर मल्याळम सिनेमाचा अनुभव असलेले शाईन रवी यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. तर सुमी प्रोडक्शनने यांची या सिनेमाची निर्मीती केली आहे. त्या शिवाय या सिनेमात दोन सुंदर गाणी आहेत, या गाण्यांना प्रसिद्ध गायिका चित्रा आणि बेला शेंडे यांनी गायले आहे. बेला शेंडे यांनी गायलेले सांग ना हे सुंदर गाणं प्रतिष्ठा भावसार यांनी लिहीले आहे, तर सिनेमाचे संगीत नितीन जंतीकर यांनी दिले आहे.

विशेष म्हणजे या सिनेमाला सिनसिनाटी इंडियन फिल्म फेस्टिवल, जयपूर फिल्म फेस्टिवल आणि ग्लोबल फिल्म फेस्टिवलमध्ये विविध पुरस्कार मिळाले आहेत.

नवोदित कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी हा वेगळा प्रयत्न केला आहे. प्रत्येक स्त्रीच्या मनाला ही कलाकृती भिडेल असा निर्मात्यांना विश्वास आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात सिनेमाला उत्तम ऍडव्हान्स बूकिंग मिळाले आहे.