‘नियतीने दुकान बंद केलं… आता “शिवसेना” नावाचे राष्ट्रवादीचे दुकान चालणार नाही’ 

मुंबई – शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने (Election Commission) गोठवलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटाला अंधेरी-पूर्व निवडणुकीत (Andheri-East by-election) हे चिन्ह वापरता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. महाविकास आघाडीच्या आणि विशेषतः जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नादी लागल्याने हे सर्व घडले, असे  काहींचे म्हणणे आहे. तर काहींच्या मते भाजपचे हे सगळे षडयंत्र होते, अशी चर्चा सुरु आहे.

अंधेरी पोटनिवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अर्थात, हा निर्णय केवळ पोटनिवडणुकीपुरता नसून चिन्हाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत लागू राहील. विशेष म्हणजे  ‘शिवसेना’ पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. शिवसेना कुणाची या वादाबाबत सुनावणी निवडणूक आयोगात सुरू असल्याने आगामी निवडणुकीत कोणताच पक्ष किंवा गट या चिन्हाचा वापर करू शकणार नाही.

दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मनसेचे नेते योगेश चिले (Yogesh Chile) यांनी यावर भाष्य केले असून ठाकरे गटाला टोमणा मारला आहे. ते म्हणतात, “बाळासाहेब बोलले होते… मी माझ्या पक्षाची काँग्रेस होऊ देणार नाही… झाली तर माझ दुकान बंद करेन… शिवसेनेची उद्धव ठाकरेंनी काँग्रेस केली… नियतीने दुकान बंद केलं… आता ‘शिवसेना’ नावाचे राष्ट्रवादीचे दुकान चालणार नाही.. बाळासाहेबांचे शब्द खरे झाले…” असं चिले यांनी म्हटले आहे.