गरीबानं कसं जगायचं, सांगाल का मोदीसरकार? यशोमती ठाकूर यांचा थेट सवाल  

मुंबई :  देशातील जनहिताच्या संघर्ष लढ्यात नेहमी आक्रमक असलेल्या काँग्रेस पक्षाच्या (NCP)अमरावतीच्या आमदार (MLA)आणि माजी महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Yashomati Thakur)यांनी केंद्र सरकार विरोधात पुन्हा एकदा सध्याच्या महागाई, मंदीवर सूचक ट्विट केले आहे. देशातील एकूणच परिस्थिती पाहाता वाढत्या महागाई आणि मंदी विरोधात अतिशय खोचक शब्दातील ट्विट करीत त्यांनी मोदी सरकाराला सामान्यांच्या प्रश्नांबाबत जाब विचारला आहे.

“रुपया पोहचवलाय 80 पार… गॅसवाला मागतो रुपये हजार… जूनमध्ये झाले 1.3 कोटी बेरोजगार… आता अन्नधान्यावरही GSTचा भार… मंदी-महागाईने सामान्य झालाय बेजार.. गरीबानं कसं जगायचं, सांगाल का #मोदीसरकार ?” असे सूचक ट्विट करीत सर्वसामान्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देतानाच त्यांनी वाढत्या महागाई (Inflation)वर केंद्रातील मोदी सरकारला(Modi Government) प्रश्न विचारला आहे. देशाचे चलन असलेल्या रूपयाचे अवमूल्यन होऊन अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत ऐतिहासिक ८० रुपयाचा नीचांकी स्तर गाठला आहे. तर देशातील स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर १००२.५० एवढा महागला आहे, त्यातच गेल्या महिन्यात तब्बल १.३ कोटी लोक बेरोजगार झाले आहेत. एकीकडे खाण्या-पिण्याचे वांदे झाले असताना आता अन्नधान्यवर जीएसटी वाढवून मोदी सरकारने सर्व सामान्यांना बेजार करून सोडले आहे.

देशात पेट्रोल डिझेल, गॅस सिलेंडरसह अगदी जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी भाववाढीने त्रस्त गरीबाने जगायचं तरी कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबद्दल आवाज उठवायचा तर मोदीसरकारने आंदोलन, उपोषणास बंदी घातली आहे, शब्दबंदीकरूनही संसदेतील सर्व सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यावरही मर्यादा आणलेल्या आहेत. मंदी आणि महागाई वर मोदी सरकार आणि त्यांचे मंत्री यावर काहीही न बोलताना दिसत नाही. महत्वाचे मुद्दे आणि सामान्यांचे रोजचे जगणे अवलंबून असलेल्या गोष्टींना बगल देत धर्म आणि मंदिरांचे राजकारण करीत फिरत आहेत. मंदी आणि महागाईमुळे देशातील गरीब अजून गरीब होत आहे, गरीबानं कसं जगायचं, सांगाल का #मोदीसरकार ? असा सडेतोड प्रश्न विचारत ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलेले प्रश्नार्थक ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे.