आकडे बहाद्दरांविरुद्ध महावितरणची धडक मोहीम; केबल, स्टार्टरसह मोटार जप्तीची कारवाई

बारामती – वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी व भारनियमन (Loadshedding) टाळण्यासाठी महावितरणवर खुल्या बाजारातून महागडी वीज घेण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे अनेक आकडे बहाद्दर बिनदिक्कतपणे विजेची चोरी करतात, त्यांच्या वाढीव भारामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाणही वाढत आहे. परिणामी महावितरणने (Mahavitaran Mahamandal) या आकडे बहाद्दरांना अद्दल घडविण्यासाठी बारामती परिमंडलाने (Baramati Parimandal) धडक मोहीम हाती घेतली असून, एका दिवसांत हजारो आकडे काढून त्यांच्या केबल व मोटारी जप्त करण्याचे काम केले आहे. या प्रयत्नांमुळे यंत्रणेवरील ताण कमी होऊन् आर्थिक भार हलका होण्यास मदत होणार आहे. तसेच ही धडक मोहीम अशीच सुरु राहणार आहे.

तापमानात जशी वाढ होईल तशी राज्याची विजेची मागणी वाढत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च महिन्यापासून महावितरणची मागणी २४५०० मेगावॅटच्या पुढे गेली आहे. तसेच ही मागणी टिकून आहे. उलट यात वाढच होत आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) व महावितरण कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र ही परिस्थिती सबंध देशात असल्याने वीज मिळणेही अवघड झाले आहे. खुल्या बाजारात विजेचे दर १२ रुपयांपर्यंत आहेत. ही महागडी वीज घ्यायची तर त्याचा बोजा पुन्हा ग्राहकांवर येणार. ती कमीत कमी घेता यावी याकरिता यंत्रणेवरील अनाधिकृत भार कमी करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी महावितरणला दिले आहेत.

आकडे बहाद्दरांवर कारवाई करताना ज्या ११ केव्ही वाहिन्यांचा करंट १०० ॲम्पीअरच्या पुढे आहे अशा ३९८ वाहिन्या बारामती परिमंडलात आहेत. त्यांना टार्गेट करुन गुरुवारी सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये अनाधिकृतपणे जोडलेले कृषीपंप, त्याचे केबल, स्टार्टर आदी जप्त केले जात आहे. घरगुती व इतर ग्राहकांचे आकडे सुद्धा काढले जात आहेत. मोहीमेपूर्वी व मोहीमेनंतर किती भार कमी झाला याचा लेखाजोखा कर्मचाऱ्यांना विचारला जाणार आहे. या कामात वरिष्ठ अभियंत्यापासून जनमित्र, ऑपरेटर, कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बारामती परिमंडलात एकूण १३ विभाग आहेत. या प्रत्येक विभागातून किमान २००० ग्राहकांवर जरी कारवाई अपेक्षित धरली तरी किमान २६००० अनाधिकृत पंप हटवले जातील . त्यातून प्रति पंप ५ अश्वश्क्तीचा जरी गृहीत धरला तरी किमान १५० मेगावॅटपेक्षा जास्तीचा ताण कमी होणार आहे.

दरम्यान, महावितरणच्या केडगाव (दौंड) विभागात बागायती क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे यंत्रणा अतिभारीत झाली आहे. कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांच्या टीमने आठ दिवसांपासून आकडे काढण्यास सुरुवात केली होती. आठ दिवसांत त्यांनी १५९१ अनाधिकृत शेतीपंपाचे आकडे केबलसकट काढून साहित्य उपकेंद्रात जमा केले होते. आता फिडरनिहाय कारवाईतही केडगावने आघाडी घेतली आहे.