शेतीपंपासाठी आठ तास वीज मिळवून देण्यात नारायण पाटील यांना अखेर आले यश

करमाळा – करमाळा मतदार संघातील शेतीपंपासाठी आठ तास वीज मिळवून देण्यात माजी आमदार नारायण पाटील यांना यश आले असून जिल्हा नियोजन मंडळाच्या आजच्या बैठकीत पाटील यांनी हा प्रश्न पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या समोर मांडला.यावर चर्चा होऊन तात्काळ महावितरणचे सोलापुर जिल्हा अधिक्षक अभियंता यांना करमाळा मतदार संघातील शेतीपंपाची वीज आठ तास करण्याचे सुचीत करण्यात आले.

यानंतर अधिक्षक अभियंता यांनी याबाबतचे आदेश करमाळा मतदार संघातील विभागीय कार्यालयांना काढण्याची हमी पालकमंत्री भरणे यांच्या समोर नारायण पाटील यांना दिली. यावर मग माजी आमदार नारायण पाटील यांनी बुधवारी करमाळा तालुक्यातील कुंभेजफाटा येथे हजारो शेतकऱ्यांना बरोबर घेऊन करण्यात येणारे रास्तारोको आंदोलन मागे घेत असल्याचा शब्द पालकमंत्री तसेच महावितरण व पोलिस प्रशासन यांना दिला आहे. आज याबाबत स्वतः माजी आमदार नारायण पाटील यांनी माहिती दिली आहे.

नुकतीच जिल्हा नियोजन मंडळात विशेष सदस्य म्हणून माजी आमदार नारायण पाटील यांची निवड करण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील काही आमदारां बरोबरच माजी आमदार नारायण पाटील यांना थेट सदस्यत्व दिले यामुळेच मग आजच्या जिल्हा नियोजन मंडळाच्या या बैठकीकडे संपूर्ण करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. परंतू माजी आमदार नारायण पाटील यांनी खास आपल्या शैलीत सध्या दोन तास वीजपुरवठा मिळत असल्याने मतदार संघातील शेतकऱ्यांना किती कठीणाईचा सामना करावा लागत आहे, या वीज कपातीमुळे शेती व दुग्ध व्यावसायिक तसेच कुकुट पालन कसे धोक्यात आले आहे, शेतीतील नुकत्याच पेरणी झालेल्या पिकांचे नुकसान कसे होत आहे आदि बाबी या बैठकीत मांडून पालकमंत्री व जिल्हाधिकारी तसेच महावितरण विभागाचे लक्ष या प्रश्नाकडे खेचुन घेतले.

यामुळेच मग गांभीर्याने या प्रश्नावर चर्चा होऊन तात्काळ दोन तासावरुन आठ तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात आला. यावर माजी आमदार नारायण पाटील यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी व महावितरणचे आभार मानले व आपले नियोजित आंदोलन मागे घेतले. हि बातमी करमाळा मतदार संघातील शेतकऱ्यांना समजताच सर्वांनी माजी आमदार नारायण पाटील यांच्या कार्यपद्धतीवर समाधान व्यक्त करत आभार प्रकट केले. यापुर्वी सुध्दा ज्या ज्या वेळी शेतकऱ्याला वीज व पाणी प्रश्नावर संकटाला सामोरे जावे लागले तेंव्हा तेंव्हा माजी आमदार नारायण पाटील यांनी आंदोलने केली व हे प्रश्न सोडवले. सन 2014 ते 2019 या दरम्यान आमदार म्हणून काम पहात असताना तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी थेट विधानसभा अधिवेशनात वीज प्रश्न मांडले, मंत्रालयीन पातळीवर बैठकांचे आयोजन करण्यास प्रशासनास भाग पाडले. यामुळे शेतकऱ्याला माजी आमदार नारायण पाटील यांच्या कडूनच हा दोन तासाचा प्रश्न सुटणार याबाबत खात्री होती. त्यानुसार आज हा प्रश्न सुटल्यानंतर शेतकरी वर्गास दिलासा लाभला आहे.