‘रिकाम्या खुर्च्यांनी आज सत्तेचा माज उतरवला…’

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) पंजाबच्या (Punjab) फिरोजपूरमध्ये होणारी रॅली (Rally) रद्द करण्यात आलीय. सुरक्षेत मोठी चूक झाल्यानं ही रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयानं (Home Ministry) दिलीय. मोदींचा ताफा 15 ते 20 मिनिटं फ्लायओव्हरजवळ फसला होता, आंदोलकांनी रस्ता अडवला होता, असं गृह मंत्रालयानं म्हटलंय. शेतकरी आंदोलनानंतरची मोदींची ही पहिलीच रॅली होती.

गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संपूर्ण प्रकरणाचा पंजाब सरकारकडून अहवाल मागवला आहे. कृषी कायदा रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला पंजाब दौरा होता, ते पंजाबमधील तेथील जनतेला संबोधित करणार होते. पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह हे देखील या रॅलीत सहभागी होणार होते.

आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. ‘सत्तर हजार रिकाम्या खुर्च्यांनी आज सत्तेचा माज उतरवला….’ असा घणाघात प्रशांत जगताप यांनी केला आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने देखील यावर सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला गर्दी नसल्याने सभा रद्द करण्यात आल्याचा आरोप केला आहे. ‘निवडणुकांआधीच पंजाबच्या जनतेने भाजपला नाकारले? पंतप्रधानांची फिरोजपूर सभा रद्द होण्यामागचे खरे कारण काय? सुरक्षेत चूक की सभेतील मोकळ्या खुर्च्या? किसान एकता मोर्चाने फिरोजपूर सभेच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या खुर्च्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकत तिथे कुणीही उपस्थित नसल्यामुळे पंतप्रधानांनी सभेला जाण्याचे टाळले, असा आरोप केलाय. त्यामुळे ही सभा रद्द होण्यामागचे खरे कारण सुरक्षेत चूक की सभेतील मोकळ्या खुर्च्या हा खरा प्रश्न आहे.’ असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.