‘मुख्यमंत्र्यांना खूश करणाच्या नादात शिवाजी महाराजांच्या वीरतेशी तुलना…’, मंगलप्रभात लोढांवर बरसल्या राष्ट्रवादी नेत्या

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खूश करणाच्या नादात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वीरतेशी त्यांची तुलना करत शिवप्रेमींच्या भावना दुखवतोय याचे भान ठेवावे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती नलावडे (Aditi Nalawade) यांनी  मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांचा खरपूस समाचार घेतला. मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तुलना शिवरायांशी केली. यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे.

“मुख्यमंत्र्यांना खूश करणाच्या नादात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या वीरतेशी त्यांची तुलना करत शिवप्रेमींच्या भावना दुखवतोय याचे भान ठेवावे. हे शिंदे-फडणवीस सरकार गद्दारीकरून व खोक्यांच्या जोरावर सत्तेत आले आहे. याचा विसर जरी मंत्र्यांना पडला असला तरी जनता मात्र हे सत्य विसरलेली नाही”, अशी प्रतिक्रिया आदिती नलावडे यांनी दिली आहे.

तसेच पुढे बोलताना आदिती नलावडेने शिंदे-फडणवीस सरकारला एक सल्लाही दिला. “शिंदे- फडणवीस सरकारने छत्रपती शिवाजीमहाराज आणि महापुरुषांचा इतिहास समजून घ्यावा. तोपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी”, असे त्यांनी म्हटले.