‘देशद्रोह्यांशी संगनमत करून महाराष्ट्राची वाट लावणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा’

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडावर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे धाबे दणाणले असून नेते आणि कार्यकर्ते भाजप आणि ईडीवर सैरभैर झाल्याप्रमाणे टीका करू लागले आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजप नेत्यांचा आनंद गगनात मावेना अशी अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.आम्हाला खात्री होती की नवाब मलिकांना अशाप्रकारे त्रास दिला जाईल, याची कल्पना होतीच अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी नवाब मलिकांच्या चौकशीबद्दल केली आहे. जे जाहीरपणे आपली भूमिका घेते त्यांना त्रास दिला जातो. कोणत्या प्रकरणात मलिकांची चौकशी सुरू आहे हेही माहिती नाही. काहीही झाले तरी दाऊदचे नाव घ्यायचे आणि नोटीस पाठवायचे असे प्रकार सध्या सुरू आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, भाजपनेते निलेश राणे यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मुंबईत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या दाऊद इब्राहिमच्या हस्तकाकडून जमीन खरेदी करणं आणि थेट संबंध असणाऱ्या नवाब मलिक याचा कार्यक्रमच नव्हे तर पुरता बंदोबस्त व्हायला हवा. देशद्रोह्यांशी संगनमत करून महाराष्ट्राची वाट लावणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा.असं राणे यांनी म्हटले आहे.

दुसऱ्या बाजूला पवारांच्या या प्रतिक्रियेवर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, मलिक यांच्यावर कारवाई झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हे होणारच होते’, असे उसासे सोडलेत. दाऊदशी संबंध ठेवणे, व्यवहार करणे हे त्यांच्या दृष्टीने फारसे गंभीर नाही ? नसेल तर त्याची काही विशेष करणे आहेत का? असा रोखठोख सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे.