‘आमच्या नेत्यांना कितीही त्रास दिला तरी आमचा भ्रष्टाचाराविरुद्धचा रणसंग्राम थांबणार नाही’

नागपूर – गोव्यासह 4 राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या दणदणीत विजयाचा जल्लोष आज नागपूर भाजपाने केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत साजरा केला. यावेळी जंगी मिरवणूक सुद्धा काढली. यावेळी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. परिणय फुके, आ. टेकचंद सावरकर, आ. समीर मेघे, खा. विकास महात्मे, दयाशंकर तिवारी यावेळी उपस्थित होते.

दरम्यान या प्रसंगी बोलताना फडणवीस म्हणाले, गोव्यातील खरा विजय हा भाजपाचा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरील विश्वासाचा आहे. टीम गोव्याचा  आहे.मी स्वागत स्वीकारले ते केवळ प्रातिनिधीक ! गोवा, उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड या प्रत्येक ठिकाणी मिळालेले मत हे विकासाला मत आहे, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवरील विश्वासाला मत आहे. विकासाच्या योजना, गरिबांसाठीच्या योजना सर्वदूर पोहोचल्या, लॉकडाऊनच्या काळात त्यांनी जनतेची सेवा केली.

युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले, तेव्हा 20 हजार भारतीयांना बाहेर काढले. आज देशात विश्वासाचे वातावरण आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच आपल्या अडचणी दूर करू शकतात, हे देशातील जनतेला ठावूक असल्यानेच ते भाजपाच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. महाराष्ट्रात आज महाविकास नव्हे तर महावसुली आघाडी आहे. दोन मंत्री जेलमध्ये आहेत. आता ही लढाई शिगेला पोहोचते आहे. आमच्या कितीही नेत्यांना त्रास दिला तरी आमचा भ्रष्टाचाराविरुद्धचा रणसंग्राम थांबणार नाही. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपा स्वबळावर ताकद दाखवेल असं देखील ते म्हणाले.