भाजपच्या जातीयवादी व धर्मवादी राजकारणाला कोल्हापूरकरांनी मुहतोड जवाब दिला – राष्ट्रवादी
मुंबई – राज्यात व देशात भाजपने जातीयवादी आणि धर्मवादी राजकारण परत सुरू केले आहे त्याला मुहतोड जवाब कोल्हापुरकरांनी दिला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी कोल्हापूरच्या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.
उत्तर कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विक्रमी विजय झाला असून याबद्दल कोल्हापूरकरांचे मनापासून अभिनंदन करतानाच महेश तपासे यांनी आभार मानले आहेत.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मतदारांना पेटीएमच्या माध्यमातून पैसे दिले जातात. त्यांची देखील ईडीच्या माध्यमातून चौकशी होईल असे वक्तव्य केले होते. त्यानंतर कोल्हापूरच्या जनतेने चंद्रकांत पाटील व भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे असेही महेश तपासे म्हणाले.
कोल्हापूर पोटनिवडणूकीतील हा विजय कॉंग्रेसचा, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेसाठी घेतलेल्या निर्णयांचा आणि धोरणांचा विजय आहे असे स्पष्ट करतानाच कोल्हापूरकरांचे महेश तपासे यांनी पुनश्च एकदा आभार मानले आहेत.