उद्योग जगतातील लोकांनी एकात्मतेसाठी आवाज उठवावा – महेश तपासे

मुंबई – कर्नाटक राज्यात काही संघटनांनी फतवे काढले असून याविरोधात उद्योग जगतातील बायोकॉन कंपनीच्या(Biocon) प्रमुख किरण मुजुमदार शॉ यांनी आवाज उठवतानाच कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना सर्वसमावेशक धोरण असावे असे सूचित केले तशाचपध्दतीने उद्योग जगतातील सर्व लोकांनी एकात्मतेसाठी आवाज उठवावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे(Mahesh Tapase) यांनी केले आहे.

मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांना हिंदू धार्मिक स्थळाजवळ असलेला व्यवसाय किंवा दुकान बंद करावे(Muslims closed there business near hindu’s temples) असा फतवा काही संघटनांनी कर्नाटक राज्यात काढला आहे. यावर महेश तपासे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

वास्तविक भारताच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी सर्वसमावेशक व सर्वधर्मसमभाव हे एकमेव धोरण प्रभावी आहे व त्याची तरतूद राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत केली आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.

एखाद्या धर्माच्या, जातीच्या व्यक्तीला त्याच्या रोजगारापासून वंचित ठेवणे म्हणजे खऱ्या अर्थाने घटनेने दिलेल्या जगण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखे आहे आणि म्हणूनच ही लढाई फक्त मुस्लीम समाजाची नसून या देशातल्या सर्व मागास, आदिवासी, भटक्या, अल्पसंख्यांक, समुदायाची आहे. भविष्यात यांचे अधिकार यापुढे अबाधित राहतील की नये असा प्रश्न समाजातल्या वर्तमान पिढीला पडला आहे असेही महेश तपासे म्हणाले.

भारतीय उद्योग जगतातील इतर मान्यवरांनी देखील एकात्मतेच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता आपल्या पद्धतीने भारतातील काही राज्यकर्त्यांना सांगण्याची आवश्यकता आहे. जात, धर्म, भाषेवर आधारित भेदभाव हा निश्चितच भारताच्या प्रगतीसाठी हानिकारक आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवन प्रणालीमध्ये सर्वसमावेशक व सर्वधर्मसमभाव हाच मूलमंत्र दिला होता. आजचे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार त्याच तत्वांवर काम करत आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.

मानव समाज, विश्व आणि भविष्यातील पिढ्या अशा नेत्यांचा नक्कीच ऋणी राहतील ज्यांनी समाज जोडण्याचे कार्य केले व अशा सरकारांचा व त्यातील नेत्यांचा तिरस्कार करतील जे समाजघातकी प्रवृत्तींच्या कारवायांवर मुग गिळून गप्प बसले आहेत असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.