‘गांजा पिकवण्याची परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल, सोबतच महसूल देखील वाढेल’

देगलूर – राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्य सरकार टीकेची धनी बनले आहे. शिवरायांच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवले जात असल्याचे सांगत विरोधकांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सुजाण नागरिक या निर्णयावर टीका करत आहेत. महत्वाचं म्हणजे सोशल मिडीयावर देखील सरकारच्या या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावरुन अनेकांनी सरकारला ट्रोल केलंय. मात्र, सरकारकडून या निर्णयाचे समर्थन करत फायदे सांगण्यात येत आहेत.

आता या वादात नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील उडी घेतली आहे. राज्य सरकारच्याया निर्णयाचा निषेध करत त्यांनी जोरदार टीका केली आहे. नवी वाईन पॉलिसी ही शेतकऱ्यांच्या फायद्याची असल्याचे सरकार सांगत आहे. वाईनच्या माध्यमातून महसूल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवविण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांनाचा गांजा विक्रीची परवानगी द्यावी असा टोला प्रताप पाटील चिखलीकर यांनी लागावला आहे. गांजा पिकवण्याची परवानगी मिळाल्यास शेतकऱ्यांचा फायदा होईल, सोबतच महसूल देखील वाढेल असा टोला चिखलीकर यांनी लगावला आहे.