मावळमध्ये राजकीय भूकंप; दिगग्ज नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने मावळमधील युवानेते देवाभाऊ गायकवाड यांच्यासह भाजपमधील अनेकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठी साथ लाभली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत मावळ तालुक्याचे चित्र पालटले. सुनील शेळके यांना लाभलेला जनआशीर्वाद हा इतका मोठा आहे की आता कोणीही तिथे आपला प्रभाव दाखवू शकत नाही. आजचा होणारा पक्षप्रवेश हा लोकांच्या या पाठबळाला अधिक ताकद दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

मावळ भागात विकास कामे जोराने सुरू आहेत. सर्वांनी तरुण नेतृत्व स्वीकारले आहे. यात आपण सर्व गट-तट सोडून एकत्र आला आहात. मावळ तालुक्याला काहीही कमी पडणार नाही याची जबाबदारी पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली आहे. तेव्हा मावळच्या विकासासाठी आपण आता एकसंघ होऊया, असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले. यापुढे सर्वांनी मिळून स्थानिक पातळीवर बूथ कमिट्या सक्षम करण्याचे काम करावे. यातूनच आता असलेल्या विधानसभेच्या ५४ जागांवरून आपण १०० जागांपर्यंत पोहोचू अशी सदिच्छा व्यक्त करत जयंत पाटील यांनी सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले.

यावेळी संतोष रसाळ, माजी सरपंच उर्से, राशीदभाई सय्यद, महादू सुतार, सरपंच आढे, धोंडीबा सावळे, चेअरमन आढले, किरण गायकवाड, उपसरपंच कांब्रे, नितीन बोडके, उपसरपंच गहुंजे, स्वामी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती वाडेकर, गणेश तिकोणे, उपसरपंच तिकोणा, दत्ताभाऊ सावळे, उपसरपंच दिवड यांच्यासह अनेकांनी पक्षात प्रवेश केला.

या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील – नागराळकर, माजी आमदार विद्याताई चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख उपस्थित होते.