Prakash Ambedkar | एका बाजूला एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत आणि दुसऱ्या बाजूला उध्दव ठाकरेंचे उमेदवार आहेत. एक भाजपासोबत आहे पण निवडणूक झाली तर दुसरा सुद्धा भाजपसोबत शंभर टक्के जाणार आहे. मग काँग्रेसवाल्यांनो त्यांना मतदान का करत आहात ? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मुंबई येथील सभेत केला. ते वंचित चे उमेदवार परमेश्वर रणशुर यांच्या प्रचारसभेत बोलत होते.
ॲड. आंबेडकर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमधील तमाशा आपण बघत आहोत. बाप एका पक्षात पोरगा एका पक्षात आहे. सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामा नये अशी परिस्थिती आहे. शिवसेना(ठाकरे) यांची महाविकास आघाडी सोबत युती झाली आहे असे सगळ्या प्रचार सभेत सांगितले जाते, पण मुंबईच्या कोणत्याही सभेत राष्ट्रवादी (शरद पवार) यांचा कार्यकर्ता दिसत नाही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि या पक्षाचे तीनही नेते या तमाशात सहभागी असतील.
खासगीकरणाच्या माध्यमातून इथल्या मागासवर्गीयांच्या आणि वंचितांच्या नोकऱ्या घालवल्या जात आहेत. खासगीकरण कशासाठी आहे ? मालमत्ता लोकांची आहे आणि ती लोकांचीच राहिली पाहिजे हे लक्षात घ्या असे त्यांनी सांगितले.
२०१४ आणि २०१९ मध्ये भाजप ७० ते ७२ टक्क्यांवर निवडणुका घेऊन गेले होते. ते आता ५० आणि ६० टक्क्यांवर आले आहे. मतदान कमी झाले आहे याचा फटका भाजपला बसणार आहे. आता ते ४०० पार नव्हे २५० पर्यंत आलेले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप