प्रियांका गांधी या दुसऱ्या इंदिरा गांधीच आहेत; यशोमती ठाकूर यांचा दावा 

पुणे – केंद्रातील लोकशाही विरोधी भाजपप्रणीत सरकारने देशभरात माजलेली अनागोंदी, अस्थिरता, महागाई याविरोधात संघर्ष करण्याची आणि हे जुलमी सरकार उलथवून टाकण्याची ताकद कोणामध्ये असेल तर ती महिलांमध्ये आहे. संसाराचा गाडा ओढत असताना महिला समाज घडवत असतात, त्याच महिला आता देश घडल्याशिवाय राहणार नाहीत. ‘लडकी हूं, लड सकती हूं’ हा नारा आता परिवर्तन घडवल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी पुण्यात व्यक्त केला. महिला काँग्रेसच्यावतीने आज पुण्यात आयोजिलेल्या ‘लडकी हूं, लड सकती हूं या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला.

महिला धोरणाचं सर्व स्तरातून स्वागत

महाराष्ट्र राज्य आपले चौथे सुधारित आणि अद्ययावत महिला धोरण लवकरच जाहीर करणार आहे. ज्या वेळेला महिला धोरण तयार झालं त्यासाठी सोनियाजींनी खूप मोठा पुढाकार घेतला होता आणि त्यामुळेच मुख्यमंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात पाहिले महिला धोरण सादर झाले होते, असे उद्गार यावेळी ॲडव्होकेट ठाकूर यांनी काढले. पुरोगामी महाराष्ट्राने केंद्र सरकारला खूप उपक्रम दिले आहेत. मात्र, केंद्र सरकार महाराष्ट्राला सध्या पाण्यात पहात आहे. महाराष्ट्राबद्दल दुजाभाव केंद्र सरकारच्या मनात असून दुटप्पी धोरण आखले जात आहे. केंद्र सरकार लोकशाही आणि संविधान तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप यावेळी ऍडव्होकेट ठाकूर यांनी केला. मात्र केंद्राचा हा प्रयत्न देशातील महिला भगिनी कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत. आपल्या महिला भगिनी आता बाहेर पडल्या आहेत, जर आता संघर्ष केला नाही, परिवर्तन केले नाही, तर उद्याची येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. त्यामुळे हे आंदोलन खऱ्या अर्थाने पुढे न्यायला पाहिजे असे सांगत त्यांनी ‘ लडकी हूँ, लड सकती हूँ’ हा प्रियांकाजींचा नारा यावेळी दिला.

केसीआर भेटीवर प्रतिक्रीया

तेलंगणा चे मुख्यमंत्री केसीआर यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त ॲड यशोमती ठाकूर यांनी तिखट प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला दिसतो. तिसरी आघाडी निर्माण करण्याचा काही प्रादेशिक पक्षांचा प्रयत्न आहे. त्याला आमच्या शुभेच्छा आहेत. सध्या राज्य विरूद्ध केंद्र असा वाद देशात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भाजपेतर राज्यांची आघाडी एक ऐतिहासिक गोष्ट आहे. देशात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होऊ शकेल अशी स्थिती सध्या दिसतेय. विविध राज्यांमधील राज्यपालांची मनमानी, केंद्राचा हस्तक्षेप, केंद्रीय एजन्सींचा गुन्हेगारी वापर यामुळे देशाची अखंडता धोक्यात आली आहे. या सर्व धोक्यांवर काँग्रेस मोदी सत्तेवर आल्यापासून बोलत आलीय. जे राजकीय पक्ष तेव्हा मोदींसोबत होते त्यांना हे धोके उशीरा समजले. देर आए, दुरूस्त आए अशी स्थिती आहे. त्या सर्वांचं मी स्वागतच करते.

आज काँग्रेसने देशव्यापी आंदोलन उभारलं आहे, प्रसंगी जीव धोक्यात घालून हा लढा सुरू ठेवला आहे. काँग्रेस ने मोदींचा विरोध करत असताना कुठलाही इगो मध्ये न आणता जिथे जिथे शक्य आहे तिथे एक पाऊल मागे घेऊन मोदी विरोधातली लढाई मजबूत केली. आज मोदी विरोधकांच्या आवाजाला जी बळकटी मिळालीय ती काँग्रेस मुळेच आहे. यापुढे ही ही लढाई काँग्रेस लढेल. काँग्रेसने लोकशाहीविरोधी घटकांशी सामना करताना कधीच तडजोड केली नाही. देशाची लोकशाही, धर्मनिरपेक्षता, राज्यघटना यांच्या रक्षणासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढू, असं ही यशोमती ठाकूर यांनी सांगीतलं आहे.

राज्यातील प्रत्येक महिला भगिनीचा आदर झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, यासाठी हे आंदोलन आपण तळागाळात पोहोचवलं पाहिजे. त्यासाठी कटिबद्ध होऊन आपण हे आंदोलन पुढे नेऊ या, असे आवाहन ऍडव्होकेट ठाकूर यांनी महिला कार्यकर्त्यांना केले.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसतर्फे आयोजित पुण्यातील गुडलक चौक येथे झालेल्या या शक्ती रॅली मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे, आमदार संग्रामदादा थोपटे, मा रमेश बागवे, मा. कमल ताई व्यवहारे, मा, दीप्ती ताई चवधरी, मा मनीष आनंद, महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी, संगीता धोंडे, निता त्रिवेदी , रुपाली कापसे, डॉ अंजली ठाकरे, जयश्री वानखेडे, सूर्यशिला मोरे, नाढे ताई. काळभोर ताई, ह्या महारष्ट्र प्रदेश पदाधिकारी उपस्थित होत्या .ह्या वेळी मा, संग्राम दादा थोपटे , संध्याताई सव्वालाखे, मा रमेश दादा बागवे यांची भाषणे झाली, पुणे शहर अध्यक्ष पूजा आनंद यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

 प्रियांकाजी दुसरी इंदिराच!

लडकी हूँ, लड सकती हूँ या प्रियांका गांधी यांनी दिलेल्या नाऱ्याबाबत प्रश्न विचारताना एका पत्रकाराने अनवधानाने इंदिरा गांधी असा उल्लेख केला, हाच धागा पकडत ॲड यशोमती ठाकूर यांनी प्रियांकाजी या दुसऱ्या इंदिराच आहेत असं प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.