मुंबईतील कोळीवाडे आणि गावठाणातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा – शेलार

भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या या मागणीच्या समर्थनासाठी भाजपाची स्वाक्षरी मोहीम 

मुंबई – मुळ मुंबईकर असलेल्या मुंबईतील गावठाण कोळीवाड्यातील घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करा अशी मागणी भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी आघाडी सरकारकडे केली असून त्याच्या समर्थनासाठी वांद्रे येथे भाजपातर्फे दोन दिवसांची स्वाक्षरी अभियान हाती घेण्यात आले आहे.

मुंबईचे मुळ रहिवासी असलेल्या आगरी, कोळी बांधवांची मुंबईत 84  हुन अधिक गावठाण आणि कोळीवाडे आहेत. यासाठी स्वतंत्र डिसीआर नसल्याने त्यांंचा पुनर्विकास होऊ शकलेला नाही. या मुळ मुंबईकरांची जुनी बैठी घरे असून त्यांचे क्षेत्रफळ 500 फुटांंपेक्षा जास्त आहे.  त्यामुळे सरकारने मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा जो निर्णय घोषित केला त्या निर्णयाचा फायदा या गावठाण व कोळीवाड्यांतील घरांना होणार नाही.

एकिकडे कोस्टल रोड, समुद्राचे पाणी गोडे करणे यासारख्या प्रकल्पांंमुळे या कोळीबांधवांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. मोठी चक्रीवादळे आली त्यामध्ये त्यांचे अतोनात नुकसान झाले त्याला मदत सरकार करु शकले नाही. तर निसर्गातील बदलांमुळे त्यांचा एकुण मासेमारी व्यवसाय अडचणीत असताना सरकारकडून डिझेल परतावा ही त्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे मच्छीमार बांधव प्रचंड अडचणीत आहे. शिवाय त्यांना इतरांन प्रमाणे कोरोना आणि लाँकडाऊनचा फटकाही बसलाच. त्यामुळे या मुळ मुंबईकरांचा अत्यंत संवेदनशीलपणे सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे सांगत आमदार अँड आशिष शेलार यांनी  कोळीबांधवांच्या घरांना सरसकट मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी आमदार शेलार यांनी सरकारडे पत्राव्दारे केली आहे.

या मागणीच्या समर्थनासाठी आज आणि उद्या दोन दिवसांचे स्वाक्षरी अभियान खार दांडा कोळीवाड्यांत राबविण्यात येत आहे. आज वांद्रे पश्चिम विधानसभेचे भाजपा अध्यक्ष किशोर पुनवत, वाँर्ड अध्यक्ष देवयानी वैद्य यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी हे स्वाक्षरी अभियान राबवले. उद्या सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खारदांडा येथे हे अभिमान राबविण्यात येणार आहे. आजच्या अभियानाला कोळी बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अशी माहिती किशोर पुनवत यांनी दिली आहे.