राज ठाकरेंच्या मशीदींवरील भोंग्यांविरोधातील भूमिकेला मिळतोय उत्तर प्रदेशात पाठींबा

मुंबई – गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील भाष्य केले. सोबतच राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय.

राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. ते ठाण्यातील उत्तरसभेत बोलत होते. न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले.

दरम्यान, भोंग्यांचा मुद्दा हा आता महाराष्ट्रतच मर्यादित राहिलेला नाही. राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंगे हटाव मागणीचे पडसाद आता देशातही उमटू लागले आहेत. उत्तर प्रदेशात हिंदू संघटनांकडून आता मशिदीवरील लाऊडस्पिकर काढण्याची तसेच आवाज कमी करण्याची मागणी होऊ लागली आहे. मशीदीवरील भोंग्याचा आवाज थांबला नाही तर, अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचा इशारा दिला आहे. ठिकठिकाणी लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावू असेही संघटनांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशात कासगंजमध्ये पटियाली शहरात भोंगे लावून अजानच्या विरोधात हनुमान चालीसा लावण्याची सुरूवात झाली आहे.