रामदास आठवलेंचा राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल; म्हणाले, ही गुंडागर्दी…

गोंदिया – मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर ३ मेपर्यंत अल्टिमेटम दिलाय. राज्य सरकारला मला सांगायचं आहे की मशिदीच्या भोंग्यांवरून आम्ही मागे हटणार नाही, तुम्हाला काय करायचं असेल ते करा. या गोष्टीचा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. तसेच ३ मेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरवा, नाहीतर देशात जिथं नमाज वाजेल तिथं हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. न्यायालयाच्या निकालाचे पालन सर्वांनी करायलाच हवे असं त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, अनेक मुस्लीम संघटनांनी (Muslim organizations) आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी राज ठाकरेंच्या विधानाचा विरोध केलाआहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात दंगल घडवण्याच्या हेतूने भोंग्याचे राजकारण केले जात आहे असा आरोप मविआचे नेते करत आहे. त्यामुळे राज्यात भोंग्यांचे राजकारण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे.

मशिदींवरील भोंगे हटवण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी विरोध केला आहे. राज ठाकरेंना त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, मात्र त्यांनी चुकीची भूमिका घ्यायला नको. जर मंदिरात भोंगे लावायचे असतील तर ते लावू शकतात, पण मशिदींवरील भोंगे हटवण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात आहे.असं देखील ते म्हणाले.

ही गुंडागर्दी करण्याचीच गोष्ट आहे. राज ठाकरे जर अशाच पद्धतीने भूमिका घेत असतील, तर रिपब्लिकन पार्टी याचा विरोध करेल. बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण करायचं आहे. त्यांना जर मंदिरावर भोंगे लावायचे असतील, तर त्यांनी लावावेत. मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी ही पुर्णपणे बेकायदेशीर आहे. बाळासाहेब ठाकरेंनीही अशा पद्धतीची मागणी कधीही केली नाही. त्यांच्यासोबतही मुस्लीम समाजाचे नेतेही होते. दहशतवादी असलेल्या मुस्लिमांचा आम्हीही विरोध केलेला आहे. सगळ्यांनीच विरोध केला आहे. अशी माहिती देखील त्यांनी दिली.