‘सरकारचं आता अति होतंय! हा रडीचा डाव’, आव्हाडांवरील आरोपांनंतर बोलले रोहित पवार

ठाणे – राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका महिलेने आव्हाडांवर विनयभंगाचा आरोप करून त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा पोलिसांनी नोंदवला आहे. या घडामोडीनंतर आव्हाडांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. आता या संपूर्ण प्रकरणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘सरकारचं आता अति होतंय! एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे! तक्रारदाराची राजकिय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे?,’ असे ट्वीट करत रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.

तसेच आव्हाडांना धीर देत रोहित पवारांनी लिहिले आहे की, ‘छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता’, स्व. अटलजींच्या या ओळी सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारे नक्कीच लक्षात घेतील. #राजीनामा_नको_लढू_आणि_जिंकू!’

नेमकं काय घडलं ?
मुंब्रा येथील उड्डाणपुलाचा हा सोहळा पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे डोंबिवलीच्या दिशेने रवाना झाले. मुख्यमंत्र्यांचा ताफा डोंबिवलीकडे रवाना होण्याआधी त्या ठिकाणी उपस्थित एका महिलेने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांच्या गाडीजवळ जात असताना आव्हाड आणि ती महिला हे आमने-सामने आले आले. यावेळी आव्हाडांनी त्यांना बाजूला केले आणि आपला मार्ग मोकळा करून पुढे निघून गेले. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक मला अपमानित करण्यासाठी दोन्ही खांद्याला धरून ‘काय मध्ये उभी आहे, चल बाजूला हो’ असे म्हणत ढकलल्याचा आरोप करत त्या महिलेने मुंब्रा पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांविरोधात विनयभंगाच्या गुन्हा दाखल केला.