भाजपानेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली वॉशिंग मशीन भाजपाकडेच आहे – सावंत

Mumbai – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज (9 ऑगस्ट) पार पडला. आज 11 वाजता राजभवनातील दरबार हॉलमध्ये एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये शिंदे गटाचे नऊ तर भाजपकडून नऊ जणांचा शपथविधी पार पडला. या सर्व आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह एकूण 20 जणांचे हे मंत्रिमंडळ असणार आहे.

भाजपकडून पहिली शपथ काँग्रेसमधून भाजपवासी झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, गिरीश महाजन, शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, सुरेश खाडे, संदीपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, रवींद्र चव्हाण, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, अतुल सावे, शंभूराज देसाई, मंगलप्रभात लोढा या क्रमाने 18 आमदार शपथबद्ध झाले.

दरम्यान, या मंत्रिमंडळ विस्तारावर कॉंग्रेसने टीका केली आहे. कॉंग्रेस नेते सचिन सावंत याबाबत म्हणाले, भाजपानेच उडवलेला चिखल साफ धुण्याचे तंत्रज्ञान असलेली वॉशिंग मशीन भाजपा कडेच आहे हे आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात ही स्पष्ट झाले. विजयकुमार गावित, संजय राठोड यांच्यावर भाजपानेच आरोप केले होते. ७२ तासांत मंत्री होणाऱ्यांना आता मुहूर्त मिळाला. त्यामुळे आता तरी कुडमुड्या ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत दादा पाटील विज्ञानवादी दृष्टीने व अब्दुल सत्तार हिंदूत्वाच्या उद्धारासाठी समर्पित होऊन काम करतील ही अपेक्षा व शुभेच्छा असं सावंत यांनी म्हटले आहे.