इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही,सदाभाऊ खोत यांची टीका

सांगली : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLC Gopichand Padalkar) यांच्या विकास निधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. यावेळी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत देखील उपस्थित होते. यावेळी शेतकरी मेळाव्यामधून आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

‘बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे,’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. शरद पवारांवर टीका करताना आमदार खोत म्हणाले की, नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्हाला विरोध करता येणार नाही, असं ब्राह्मण समाजाला सांगितलं. मात्र आम्ही असं म्हटलंच नाही, हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे. त्यामुळे बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत, मला वाटतं की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही, असं खोत यांनी म्हटलं आहे.

मी आणि गोपीचंद पडळकर पागल माणसं…. क्रांती करायला पागल माणसं लागतात, शहाणी माणसे क्रांती करत नाहीत, शहाणी माणसे अभ्यास करतात. शहाणी माणसं तत्वज्ञान शिकवतात. पागल माणसं क्रांती करतात. त्यामुळे आम्ही दोघां पागलांना राज्यात क्रांती करायची आहे आणि मी पुन्हा येईन हे खरं करायचे आहे असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.