‘सावरकरांचा अपमान करणाऱ्या बाजार बुणग्यांना भर चौकात चाबकाचे फटके दिले पाहीजेत’

मुंबई : काँग्रेसची भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) सध्या सुरु आहे. यात बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी विधान केलं. भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर टीका केली.

सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकर तुरुंगातून बाहेर आले तेव्हा खरे सावरकर सगळ्यांसमोर आले. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे. सावरकर यांची विचारधारा देशाला तोडणारी आहे, तीच विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे मी काम करेन, असं म्हणत राहुल गांधी यांनी सावरकरांच्या स्वातंत्र्य लढ्यातील भूमिकेवर टीका केलीय.

दरम्यान,  भारतमातेच्या थोर सुपुत्राचा आणि एका मराठी महापुरुषाचा राहुल गांधींनी अपमान केल्याचे राजकीय पडसाद आता उमटू लागले आहेत. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी देखील या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हा महाराष्टाचाच नाही तर देशाचा अपमान आहे. सावरकरांचा अपमान करणाऱ्या बाजार बुणग्यांना भर चौकात चाबकाचे फटके दिले पाहीजेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना काही लोक मिठ्या मारतात या नेत्यांच करायच काय  खाली डोक वर पाय . असं देशपांडे यांनी म्हटले आहे.