भाजपाच्या केंद्र सरकारने दाऊदची गंचाडी पकडून मुंबईला आणला पाहिजे – संजय राऊत 

मुंबई – मनी लाँड्रिंगच्या (money laundering case) आरोपांचा सामना करत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (ED on Nawab Malik) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. विशेष न्यायालयाने नवाब मलिकविरुद्धच्या खटल्याची सुनावणी करताना ईडीने सादर केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. यावर कोर्टाने नवाब मलिक यांचे डी-गँगशी (D company) संबंध होते असं निरीक्षण नोंदवलं आहे.

नवाब मलिक (Nawab Malik) यांचा थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभाग होता असेही न्यायालयाने म्हटले आहे. याशिवाय नवाब मलिकांनी गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी हसीना  पारकरसोबत (Hasina Parkar) वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लाँड्रिंग केलं असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे.

दरम्यान, न्यायालयातील या घडामोडींवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून सत्ताधाऱ्यांची मलिक यांच्यामुळे चांगलीच गोची झाली आहे. यातच आता  शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे. केंद्र सरकारने आधी दाऊदला पाकिस्तानातून फरफटत आणले पाहिजे. अमेरिकेने पाकिस्तानमध्ये जाऊन लादेनला मारले तसं भाजपाच्या केंद्र सरकारने दाऊदची गंचाडी पकडून मुंबईला आणला पाहिजे. तो मोठा गुन्हेगार आहे तर त्याला तिथे मोकळा का सोडला आहे. मुळात दाऊद जिवंत आहे की नाही हे आधी तुम्ही स्पष्ट करावे. दाऊद कुठे आहे आणि काय करत आहे हे केंद्र सरकारला माहिती आहे. तुम्ही जगातील इतके मोठे नेते आहात. दाऊद तुमच्यासमोर मच्छर आहे त्याला पकडून घेऊन या,” असे संजय राऊत म्हणाले.