संजय राऊतांनी स्वत:ला आवरावं अन्यथा ठोकून काढू; छावा संघटनेचा निर्वाणीचा इशारा  

पुणे  – महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याने राज्यात राज्यकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राज्यातील राजकीय उलाथापालथीला प्रचंड वेग आला आहे. यातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची बेताल वक्तव्ये सुरु असून अख्या शिवसेनेची यामुळे डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान,  खासदार संजय राऊत (Sanjay Raut) मराठा समाजाविरोधात अभद्र शब्द वापरत आहेत. त्यांनी स्वत:ला आवरावं अन्यथा छावा संघटनेचे छावे त्यांना ठोकून काढतील, असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील (Nanasaheb Javle-Patil) यांनी आज पुण्यात बोलताना दिला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्या मुंबईत येत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी हजारो छावे उद्या मुंबईत दाखल होतील, असे जावळे-पाटील यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीराजांना खासदारकीपासून रोखण्याचं काम शिवसेना आणि संजय राऊतांनी केल्याचा आरोपही जावळे-पाटील यांनी केला आहे. मुंबई तुमच्या बापची नाही. हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे. खासदार राऊतांनी आपली टवाळकी बाहेर जाऊन करावी. राज्यात यापुढे ठाकरेशाही चालणार नाही.आम्ही सत्तेसाठी कधीही लाचारी स्वीकारली नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे. असं देखील ते म्हणाले.