“बावनकुळेंना एवढे अधिकार कोणी दिले, फक्त ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?”

मुंबई- 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे गट एकत्र मिळून ही निवडणूक लढणार आहेत. त्यात शिंदे गटाला किती जागा मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मोठं विधान केलं आहे.

भाजपच्या प्रसिद्धी प्रमुखांची काल बैठक पार पडली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रसिद्धी प्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाच जाहीर केला. यावेळी ते म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढवणार. त्यामुळे शिंदे गटाला फक्त 48 जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदे गटाकडे 50 आमदारांचं बळ असतानाही त्यांची केवळ 48 जागांवर बोळवण केली जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून आता यावर भाजपच्या मित्रपक्ष आणि शिवसेना नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

अशातच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे कान टोचले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्टेटमेंटमध्ये दम नाही. बावनकुळे यांना एवढे अधिकार कोणी दिले, हे माहिती नाही? अशा वक्तव्यामुळे युतीमध्ये बेबनाव निर्माण होतो, याची जाणीव बावनकुळे यांना असायला पाहिजे. आम्ही काय मुर्ख आहोत का फक्त ४८ जागा लढवायला? भाजप-शिवसेना जागावाटपासाठी वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो काही निर्णय घेतील त्यांना घेऊ दे. चंद्रशेखर बावनकुळे यांना हे अधिकार कोणी दिले? अशाने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढते, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.