‘सत्ता टिकवण्यासाठी सत्ताधारी संघर्ष करत आहेत तर सरकारचे लचके तोडण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत’

पुणे  – भाजपला राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत असून सरकारच्या कामगिरीबाबत महाविकास आघाडीतील नेते समाधान व्यक्त करत आहेत  तर विरोधीपक्षातील नेत्यांनी ठाकरे सरकारची पोलखोल सुरु केली आहे.

या पार्श्वभूमीवर आता संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात सुडबुद्धीचे राजकारण सुरू आहे. दररोज होणाऱ्या वेगवेगळ्या आरोपातून सरकारने घाबरत घाबरत दोन वर्षे पूर्ण केली. सत्ता टिकवण्यासाठी सत्ताधारी संघर्ष करत आहेत तर सरकारचे लचके तोडण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. केंद्रीय चौकशी एजन्सीचा महाराष्ट्रात तक्रारींचा पाऊस पडत आहे. यामध्ये सर्व सामान्यांचे प्रमुख प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. तीन पक्ष एकत्र येऊन अचानक सुरू झालेला महा विकास आघाडी च्या नावानं सुरू झालेला संसार हा १०० कोटी च्या वसुलीत प्रमुख कारभारी (गृहमंत्री) आरोपामुळे जेलमध्ये गेलेले आहेत. जर या सरकारचा असा प्रवास असेल पाच वर्षात किती नेते आत मध्ये जातील हा संशोधनाचा विषय आहे. सगळे पक्ष सत्तापिपासू असल्यामुळे खुर्चीला चिटकुन आहेत. सरकारने जाहीरनाम्यात दिलेले शब्द पाळावेत.

सामान्य माणसाच्या प्रश्नांचा मागण्यांचा खेळखंडोबा झाला. सरकार महत्त्वाचे सगळे विषय दुर्लक्षित करत आहे. संभाजी ब्रिगेड हे खपवून घेणार नाही. सत्तेशिवाय शहाणपण नाही म्हणून हे सगळे एकत्र येऊन सत्ता गाजवत आहेत.सामान्य जनतेचा कोणीही नाही. सत्ताधाऱ्यांनी ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केलं तर कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरक्षणाची प्रश्न प्रलंबित असताना नोकरीच्या प्रश्नात गोंधळ सुरू आहे. कोरोना महामारीत माणसं कशीतरी जगलीत तर दुसरीकडे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे माणसं मरत आहेत.

महाराष्ट्रात जातीयवादीचे विष पेरले जात आहे. धर्मांध शक्ती धार्मिक दंगली घडवण्यासाठी माणसांची डोकी भडकवतात आहेत. यामागे सत्तेचा सारीपाट आहे. पुढची तीन वर्ष सर्वांनी संयमाने राहणे आणि सामाजिक धार्मिक व राजकीय भावना जपणे गरजेचे आहे. सूडाच्या राजकारणात सामान्य माणसाचा जीव जाऊ नये याच महाविकास आघाडी सरकारला पुढील राजकीय वाटचालीस साठी शुभेच्छा…

महाविकास आघाडी या शब्दाचा अर्थ अजूनही समजला नाही. या सर्वांचा हिशोब, दोन वर्षाच्या सरकारच्या कारभाराचा लेखाजोखा संभाजी ब्रिगेडच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय मेळाव्यात मंगळवार दि. 30 नोव्हेंबर 2021 रोजी मुंबई येथे रंगशारदा सभागृहात घेतला जाणार आहे.

हजारो कोटींचा भ्रष्टाचार, वसुली, खाजगीकरण आणि महागाईने जनता त्रस्त आहे… हे महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकारचे अपयश आहे. सध्याच्या राजकारणातून मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना बळ मिळेल, विरोधकांना सद्बुद्धी देवो व महाराष्ट्रातील महागाई, बेरोजगारी, जातिवाद संपून जावो याच मनस्वी सदिच्छा…असं शिंदे यांनी म्हटले आहे.