पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी स्थानकाजवळ काल सकाळी आगरतळा – सियालदाह कांचनगंगा एक्सप्रेस (Sealdah Kanchenjunga Express accident) मालगाडीला धडकल्यानं नऊ जण ठार आणि किमान ६० जण जखमी झाले. न्यू जलपाईगुडीपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर असलेल्या रंगपाणी रेल्वेस्थानकानजिक दोन गाड्यामध्ये धडक झाली, त्यामुळे एक्सप्रेस गाडीचे मागील दोन डबे रुळावरून घसरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या निकटवर्तीयांना पंतप्रधान सहायता निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनीही या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं असून जखमींना जलद बरे वाटावं यासाठी प्रार्थना करत असल्याचं आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल अपघात स्थळाला भेट दिली आणि मदत आणि बचावकार्याची पाहणी केली. तसंच रुग्णालयात जावून जखमींची चौकशी केली. मृतांच्या निकटवर्तीयांना १० लाख रुपये, गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना ५० हजार रुपयांची मदत मंत्रालयाच्या वतीनं देणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्र्यांनी यांवेळी केली.
सिलीगुडीमध्ये काल सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात दिवसभर अडथळे आले. रेल्वेगाडी आगरतळाहून सियालदहला जात असताना सकाळी नऊच्या सुमारास हा अपघात (Sealdah Kanchenjunga Express accident) झाला. त्यामुळे या मार्गावरील लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या होत्या.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप