‘मतांसाठी राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या उद्धव ठाकरेंची पवार साहेबांनी बोलती बंद केली’

मुंबई- ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी अनेक राजकीय विषयांवर उलगडे केले आहेत. महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) निर्मिती कशी झाली इथपासून ते बरेचसे राजकीय किस्से शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहेत. याच आत्मचरित्रात ठाकरे गटाची कोंडी करणारा एक मजकूर आहे.

मुंबई केंद्रशासित होण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळायला हवा. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करावी, असे दिल्लीतील कोणत्याही पक्षाच्या नेत्याच्या मनात नाही हे मी जबाबदारीने सांगू इच्छितो, असं पवारांनी पान क्रमांक ४१७ वर लिहिलं आहे. यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांची (Sanjay Raut) चांगलीच कोंडी झाली आहे. कारण मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप स्वतः ठाकरे आणि संजय राऊत सातत्यानं करत असतात.

दरम्यान, आता या मुद्द्यावरून भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले आहे. मुंबई तोडण्याचा केंद्राचा कोणताही मानस नसल्याचं शरद पवार साहेबांनी आपल्या आत्मचरित्रात लिहलंय….उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा खुद्द पवार साहेबांनीच समोर आणलाय. मुंबई तोडण्याची भीती दाखवून वर्षानुवर्षे #BMC लुटण्याचं काम केलं गेलंय.मतांसाठी राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या उद्धव ठाकरेंची पवार साहेबांनी बोलती बंद केली, हे बरं झालं…असं म्हणत वाघ यांनी ठाकरेंना चांगलंच फटकारले आहे.