शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकपेक्षा भ्रष्ट; मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनले :- बाळासाहेब थोरात

लोकांचे ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित करुन शिंदे सरकार इव्हेंटमध्ये मग्न.

मुंबई –  राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राज्यातील सरकार जनतेच्या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहे. शेतमालाला भाव नाही, भाजीपाला रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. अवकाळीच्या नुकसानीनंतर सरकारने विधानसभेत मदतीची घोषणा केली पण अद्याप ही मदत मिळालेली नाही. कांदा उत्पादक शेतकरी उद्धवस्त झाला आहे. कांद्याला अनुदान जाहीर केले पण जाचक अटीमुळे ही मदतही शेतकऱ्याला मिळाली नाही. शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्या वाढत आहेत. महागाईने जनता त्रस्त आहे, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे आणि शिंदे सरकार मात्र मोठ मोठे इव्हेंट करण्यात मग्न आहे. शिंदे सरकारकडून लोकांना काय मिळाले तर केवळ पोकळ घोषणा मिळाल्या अशी परिस्थिती आहे.

लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास वाढला…
लोकसभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दोन दिवसांची बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. एकत्र लढून भाजपाचा पराभव करणे हा आमचा उद्देश आहे. ज्या जागा आमच्याकडे नाहीत पण त्या मतदारंसघात काँग्रेसची ताकद आहे त्या जागा काँग्रेसला मिळाव्यात यासाठी आम्ही आग्रह धरु. शिंदे-फडणवीस सरकारबद्दल राज्यात प्रचंड नाराजी आहे, जनता भाजपाच्या द्वेषाच्या राजकारणाला कंटाळली आहे. आम्ही एकत्र लढून लोकसभेच्या ४० जागा जिंकू शकतो असे चित्र आहे.
राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेचा कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत प्रभाव दिसला. आता दुसरी पदयात्रा काढत असतील तर त्याचाही नक्कीच फायदा होईल. राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेने इतिहास घडवला आहे. पदयात्रेत जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांची चर्चा झाली. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कष्टकरी यांच्या समस्यांवर चर्चा झाली आणि हेच निवडणुकीतील मुद्दे आहेत.

ओडीशातील रेल्वे अपघातप्रकरणी रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा.

ओडिशातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ झालेला रेल्वे अपघात शतकातील मोठा अपघात आहे. या अपघातील मृतांची संख्या पाहून मन सुन्न झाले. अपघातात एकही बळी जाऊ नये अशीच अपेक्षा आहे अपघात रोखणारे महाकवच मोठा गाजावाचा करु आणले होते ते कोठे गेले? एवढा मोठा अपाघात झाला त्याची जबाबदारी कोणावर तरी निश्चित झाली पाहिजे. ओडीशा अपघातीची नैतिक जबाबदारी म्हणून रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, १९५६ साली महबूबनगर रेल्वे अपघात झाला असताना तत्कालीन रेल्वे मंत्री लालबहाद्दुर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. आजचा अपघात भयंकर आहे, जिवित हानी प्रचंड झाली आहे, त्याची जबाबदारी घेऊन रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मुळात रेल्वे मंत्री असतात कुठे हाच प्रश्न आहे. देशात कुठेही रेल्वेला हिरवा झेंडा दाखवायचा असेल तर पंतप्रधानाच असतात. ओडीशातील रेल्वे अपतात अत्यंत भयानक व दुःखद आहे. याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे.

निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न…
अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरणारा निळवंडे प्रकल्प व्हावा हे स्वप्न आम्ही पाहिले होते. आज आमचे स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद होत आहे. या प्रकल्पासाठी शासनस्तरावर सातत्याने आम्ही पाठपुरावा केला त्यामुळेच आज दुष्काळी भागाला पाणी मिळत आहे. पण काही लोक निळवंडे प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. केवळ पाणी सोडण्याची संधी मिळाली म्हणजे काम त्यांनी केले असे होत नाही. जिल्ह्यातील जनतेला माहिती आहे की या प्रकल्पासाठी कोणी प्रयत्न केले. कोणी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये, लोकांना पाणी मिळाले याचा आम्हाला आनंद आहे, असेही थोरात म्हणाले.