आगरा येथील शिवाजी महाराजांचे स्मारक तरुणाईला प्रेरक ठरेल !

लखनौ : महाराष्ट्राच आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे; मुगलसम्राट औरंगजेबाने ज्या क्रूरतेने महाराजांना आग्र्यामध्ये जेरबंद केले होते, तितक्याच चपळाईने मोगलांच्या डोळ्यात धूळ फेकत महाराजांनी केलेली स्वतःची सुटका म्हणजे साहस, शौर्य, चतुराई आणि उत्तम कार्ययोजनेचे आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढीला या जाज्वल्य इतिहासाची सतत आठवण राहावी यासाठी उत्तर प्रदेशातील आग्रा येथे महाराजांचे प्रेरणा स्थळ व्हावे अशी भावना महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज लखनौ येथे व्यक्त केली. आज येथे पत्रकारांशी ते बोलत होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भूमिका ही भारतीय संस्कृतीचे स्फुल्लिंग चेतवीणारी आणि विरासतीची जोपासना करणारी आणि त्या माध्यमातून भावी पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी अश्या प्रेरणादायी स्थळांचा विकास करणारी आहे. असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्राच्या मनामनांत आणि घरघरात पुज्यस्थानी असलेल्या शिवाजी महाराजांच्या आठवणी आगरा या शहराशी जुळलेल्या आहेत. म्हणूनच येथे महाराजांचे प्रेरणा स्थळ व्हायला हवे, यासाठी आगरा येथील आमदार योगेंद्र उपाध्याय आणि काही इतिहाकारांनी निश्चित केलेल्या स्थान निश्चित करावे असेही ते म्हणाले.

उत्तर प्रदेश पर्यटन मंत्र्यांकडून प्रस्ताव देखील पाठविण्यात आला असल्याची माहिती देत त्यांनी यासाठी मी स्वतः आणि महाराष्ट्र सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा तसेच पर्यटन मंत्री नीळकंठ तिवारी, विधिमंडळाचे मुख्य सचेतक, आ. योगेंद्र उपाध्याय यांचे त्यांनी याविषयी पुढाकर घेतल्याबद्दल आभार मानले.