वर्धा :- रेशीम कोषांना मिळणारे जास्त भाव लक्षात घेता व इतर पिकांचे भावामधील चढउतार पाहता गावातील शेतकरी बांधवांनी पारंपारीक शेतीसह रेशीम शेतीउद्योग करुन आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन महारेशीम अभियान 2022 अंतर्गत तुती लागवड विकास कार्यक्रमात रेशीम विकास अधिकारी अजय वासनिक यांनी केले.
समुद्रपूर तालुक्यातील ग्राम रामनगर येथे तुती लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला रामनगर ग्रामचे सरपंच धोटे, रेशीम प्रगतीशील शेतकरी सचिन वाघमारे, वरीष्ठ तांत्रिक सहायक वाघमारे व क्षेत्र सहाय्यक भैरम आदी उपस्थित होते.
पारंपारीक शेती बरोबरच शेतीसाठी एक उत्तम पुरक व्यवसायाचा पर्याय म्हणुन रेशीम शेती फायदेशीर आहे. पारंपारीक पिकाचे तुलनेत मिळणारा भरघोष फायदा व नफा असल्याने शेतक-यांनी तुती लागवड करुन रेशीम कोषांचे पीक घेऊन प्रगती साधावी. असे अजय वासनिक म्हणाले.
यावेळी गावातील शेतक-यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत प्रति एकर 3 लाख 32 हजार 740 रुपये तीन वर्षासाठी तुती लागवड व किटक संगोपन गृह बांधकामाकरीता तसेच मजूरी सामुग्रीकरीता लाभ देण्यात येते. तसेच पोकरा अंतर्गत रेशीम शेतीकरीता विविध योजनाचा लाभ देण्यात येत असल्याचीही माहिती यावेळी शेतक-यांना सांगितले.
सर्व साधारण शेतक-या रेशीम शेतीपासुन मिळणा-या कोष उत्पादनाची पुरीपुर्ण माहिती नसल्याने या शेती उद्योगाकडे मोठया प्रमाणात शेतकरी वळलेले दिसून येत नाही. मनरेगा व पोकरा योजना अंतर्गत तुती रेशीम उद्योगात महिलांचा सहभाग वाढविणे, तुती वृक्षाची लागवड करुन पर्यावरणाचा संतुलन राखणे व उत्पादनात वाढ करने तसेच रेशीम तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचविण्या करीता जिल्हयात 25 नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक गावात महा रेशीम अभियान राबवून रेशीम शेती बाबत जनजागृती करण्यात येत आहे. अभियाना दरम्यान इच्छुक शेतक-यांनी रेशीम शेती करण्याकरीता नावाची नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास कार्यालयाचे वतीने करण्यात येत आहे.
https://youtu.be/FkhUTw1OjTM