..तर केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईट करतील; अशा धमक्या मला दिल्या- राऊत

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. तसेच त्यांनी इडीच्या विरोधात देखील मोठं वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधताना म्हणाले की राज्यात राष्ट्रपती राजवट नाही तर काही आमदार तोडून आम्ही सरकार बनवु अशा पद्धतीची धमकी मला देण्यात आले.

केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रातील नेत्यांना कशा पद्धतीने त्रास देतात याबद्दल मी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र पाठवलं होतं. यापासून हे प्रकरण सुरू झालं आहे. भाजपचे प्रमुख नेते मला २० दिवसांपुर्वी तीन वेळा भेटले होते. त्यांनी मला वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला की, तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थितीत हे सरकार आम्हाला पाडायचं आहे. आमची संपूर्ण तयारी झाली आहे. राष्ट्रपती राजवट नाही तर काही आमदार तोडून आम्ही सरकार बनवु. तुम्ही मध्ये पडू नका अशा पद्धतीच्या धमक्या मला दिल्या होत्या, असा खुलासा संजय राऊत यांनी भाजपवर केले आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जर तुम्ही आम्हाला यासाठी मदत केली नाही तर केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईट आणि फिक्स करतील. त्यांची नावे भविष्यात उघड करणार. महाराष्ट्रात पवार कुटुंबावर देखील इडीच्या सातत्याने धाडी पडल्या. त्यांना देखील या पद्धतीच्या धमक्या दिल्या. आम्ही इडी आणि सीबीआय बरोबरच केंद्रीय पोलीस बल आणून सगळ्यांना थंड करू. त्यानंतरच माझ्यावर आणि माझ्या आजूबाजूच्या लोकांवर इडीच्या धाडी पडायला सुरुवात झाली.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शिवसेना भवन याठिकाणी येण्यासाठी आव्हान केले होते. त्यांच्या या आव्हानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनासमोर गर्दी केली होती. त्या सगळ्यांना पत्रकार परिषद बघता येईल याठिकाणी शिवसेना भवनासमोर एलइडी लावण्यात आली होती.