वारकरी संप्रदायाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबध्द – संजय बनसोडे

लातूर :- महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भुमित अनेक वारकरी संप्रदाय निर्माण झाला आहे. ही वारकरी संप्रदाय भक्ती चळवळीच्या माध्यमातून समाज मनाचे प्रबोधन केले जाते. वारकरी मंडळीचे काही प्रश्न आहेत, ते शासन स्तरावर सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम पाणी पुरवठा व स्वच्छता पर्यावरण भूकंप पुनर्वसन रोजगार हमी राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले.

वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र जिल्हा लातूर आयोजित १० वा वर्धापन दिनानिमीत्त विठ्ठल वारकरी पुरस्काराचे वितरण सोहळा लातूर येथील विष्णूदास मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी ह.भ. प. माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प.गुरुवर्य गुरुबाबा औसेकर महाराज, लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, अविनाश रेशमे, धनराज पारीक धामणगावकर , अतिजी माने, श्रीधरजी धुमाळ , दगडुअप्पा कोरे, माधव महाराज पवार, शशिकांतजी पारीक, पुंडलिक मृगजळे , सौ . लक्ष्मीछाया बड़के, सौ . सुनंदा भडक, सौ. मुक्लाबाई देवे, सौ. कौशव्यालाई करडिले, अहिल्याबाई शिंदे, मधुबाला एजगे, वेळापूरे, त्रिवेणी ताई , संजिवनीताई राऊत आदींची उपस्थिती होती.

राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे, संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम महाराज या संतांचा मोठा प्रभाव मराठी मनावर सातत्याने टिकून आहे. कोणत्याही काळात या परंपरेशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी पाया घातला आणि तुकोबांनी कळस रचला, अशी मांडणी केली जाते आहे. ही परंपरा आणि संत विचाराचा एक समान धागा सर्वांमध्ये आहे. या भक्ती चळवळीतून समाजमनाचे प्रबोधन करण्याचे मोठे काम आजपर्यंत झाले आहे.
समाजात जात-धर्म यांच्यात वाढलेला तणाव संपवण्याचे काम हे केवळ ही संत परंपराच करू शकते, असे सांगून समाजाची अस्थिरता संपविण्याचे कामही संत विचाराच्या प्रबोधनातून शक्य असल्याचे राज्यमंत्री बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात अजून तरी कथन आणि श्रवण संस्कृती टिकून आहे. त्याला संत विचारांचे एकात्म दर्शन कारणीभूत असून या चळवळीच्या माध्यमातून संतुलित, सकस विचार तरुणांपर्यंत पोहचेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.