Sunil Tatkare | आजपासून सुरू झालेल्या राज्यव्यापी दौऱ्याची व्यापकता लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर अजून वाढवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमच्या ताकदीवर महाराष्ट्रात शक्तीशाली करायचा आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले.
‘एकच लक्ष्य विधानसभा क्षेत्र’ हे ब्रीदवाक्य घेऊन आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात अहमदनगर जिल्हयातून केली.
देशाला स्वातंत्र्य मिळाले तिथपासून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा व इतर क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी या अहमदनगर जिल्ह्यातून झाली म्हणून या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करताना यापूर्वी हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी राहिला तसाच पुन्हा एकदा अजितदादाला पाठिंबा देईल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.
धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे काम महाविकास आघाडीने केले. याच आधारावर लोकसभा निवडणूक राज्यात लढली गेली शिवाय ही निवडणूक अक्षरशः ग्रामपातळीवर नेऊन ठेवली गेली. मात्र असे असताना नगर शहराचे तरुण आमदार संग्राम जगताप यांनी महायुतीच्या उमेदवारांना ३२ हजाराचे लीड देत या सगळ्यावर मात करून दाखवले त्याबद्दल सुनिल तटकरे यांनी त्यांचे आभार मानले.
पक्षाचा कार्यकर्ता हा धोरण समोर ठेऊन आणि नेता जे काम करतो ती भूमिका घेऊन काम करत असतो त्यावेळी नेत्याच्या त्या संवेदना घेऊन लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोचायचे असते असेही सुनिल तटकरे म्हणाले.
यापुढे सर्वांनी जबाबदारीचे भान लक्षात घेऊन काम केले पाहिजे असे सांगतानाच विरोधकांनी ज्यापद्धतीने गैरसमज पसरवले आहे ते कसे चुकीचे आहे हे लोकांना सांगायची गरज आहे असे आवाहन कार्यकर्त्यांना सुनिल तटकरे यांनी केले.
अजितदादांचे नेतृत्व व्यापकतेने पुढे न्यायचे असेल तर अजितदादांना ताकद देणे गरजेचे आहे. जनाधार वाढवण्याची ताकद आपल्या कार्यकर्त्यांमध्ये असली पाहिजे असा विश्वास निर्माण करणारे मार्गदर्शन सुनिल तटकरे यांनी यावेळी केले.
भाजपकडे जाऊन सत्तेत सहभागी होणार होते त्यांनी आम्हाला शिकवू नये असा टोला सुनिल तटकरे यांनी रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.
यापुढे सर्व घटकांना सोबत घेऊन काम करायचे आहे. त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. शिव – शाहू – फुले – आंबेडकरांची विचारधारा आम्ही सोडलेली नाही हे आपण सांगत आहोतच परंतु लोकसभा निवडणुकीत जे जे घटक बाजूला गेले आहेत त्या घटकांना सोबत आणण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.
योग्य भूमिका घेऊन लोकांसमोर गेलो तर पक्षाचे व्यापक हित जोपासणारे आणि जो आपल्यासाठी दिवसरात्र काम करतोय त्याला जनमानसात स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करुया असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप