शिंदेच्या अयोध्या दौऱ्यामुळे ठाकरे गटाला मिरच्या झोंबल्या; प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, ते गद्दार… 

मुंबई  :  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रविवारी अयोध्या दौऱ्यात जोरदार शक्तीपदर्शन केलं.(CM Eknath Shinde In Ayodhya) रविवारी दिवसभरात निर्माणाधीन अयोध्येतील राम मंदिराची पाहणी केल्यानंतर सायंकाळी शरयू नदीच्या तीरावर आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भूसे, गिरीश महाजन, शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

या दौऱ्यात शिंदे यांनी आपला हिंदुत्ववादी बाणा कायम ठेवल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे तर दुसऱ्या बाजूला विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यातच आता  राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या दौऱ्यावर टीका केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी रामलल्ला यांच्या दर्शनासाठी जायचं असेल तर भक्त म्हणून जा, राजकीय पर्यटक म्हणून नाही असं सुनावलं.

प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) म्हणाल्या, “जे रामलल्ला यांच्या दर्शनासाठी अयोध्येला जात आहेत त्यांनी भक्त म्हणून दर्शन घ्यावं, राजकीय पर्यटक म्हणून जाऊ नये. या पवित्र ठिकाणाचा राजकारणासाठी वापर होताना पाहून वाईट वाटलं. असं असलं तरी ते केवळ ‘गद्दार’ आहेत, दुसरं काहीही नाही.”

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनीही शिंदेंवर सडकून टीका केली आहे.  “शिंदे अयोध्येत आहेत. प्रभू राम यांनी प्रामाणिकपणे सत्याचा मार्ग अवलंबला आणि त्याग केला. बाळासाहेब ठाकरेंनीही हे गुण आत्मसात केले. षडयंत्र रचणारे संधीसाधू आणि पाठीत खंजीर खुपसणारे हा वारसा पुढे नेऊ शकत नाही.”असं कपिल सिब्बल म्हणाले आहेत.