‘फसवणूक, चोरी, लबाडी, डाकूगिरी, माफियागिरी यासाठी ठाकरे-परब यांना नोबेल पुरस्कार मिळेल’

मुंबई : दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आपल्यावर कारवाई केली, यामध्ये मनी लॉंड्रिंगचा संबंध नाही अशी माहिती राज्याचे मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दापोलीतील रिसॉर्ट हे सदानंद कदम यांच्या मालकीचे असून त्याच्याशी माझा काही संबंध नाही असंही अनिल परब म्हणाले. यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचा सातबारा कोरा करणार असा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी मालमत्ता कराच्या पावत्या दाखवत सोमय्यांनी परब आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागलं.

अनिल परब यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर ‘तो मी नव्हेच’ या नाटकाची मला आठवण झाली. ‘तो मी नव्हेच’ नाटकासाठी माधव पळशीकरांना अनेक बक्षीसं मिळाली होती. आज जर ते नाटक पुन्हा करायचं ठरलं तर अनिल परब यांना पसंती दिली जाईल. एक माणूस इतका नाटकी बनू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलं. अनिल परब आपला रिसॉर्टशी काही संबंध नसल्याचं म्हणत आहे. पण मी काढलेल्या १२ मुद्द्यांची उत्तरं का दिली जात नाहीत, अशी विचारणा किरीट सोमय्यांनी केली आहे.

फसवणूक, चोरी, लबाडी, डाकूगिरी, माफियागिरी यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांना नोबेल पुरस्कार मिळेल. उद्धव ठाकरेंनी बंगल्याबद्दल नाटकं केलं. अनिल परबांनी महावितरणला अर्ज केलाय. मुख्यमंत्री अनिल परबांचा फोटो ओळखतात की नाही. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब सांगतात की, माध्यमांना फसवलं, गंडवलं,’ असं म्हणत सोमय्यांनी उद्धव ठाकरे आणि परबांवर हल्ला चढवला.