बोगस भरती प्रकरणातील आरोपींची कसून चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई केली जावी – धनंजय मुंडे

प्रकरणातील आरोपी यांचा माझ्या कार्यालयाशी कसलाही संबंध नाही - मुंडेंचा खुलासा

मुंबई – धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मंत्री असताना त्यांच्या कार्यालयात कर्मचारी असल्याचे भासवून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी व्हावी, तसेच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन यातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली आहे.

या प्रकरणात निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुडतकर अशा तीन आरोपींची नावे समोर आली असून, यांपैकी कोणत्याही व्यक्तीचा आपल्याशी किंवा तत्कालीन मंत्री कार्यलयाशी कसलाही संबंध नसल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात शिपाई असल्याचे भासवत या तरुणांनी एका जनास नोकरी लावून देतो, असे सांगत फसवणूक केली असून, या बोगस नोकर भरती प्रकरणी देण्यात आलेले पत्र देखील बनावट आहे, त्यावर असलेले सह्या आणि शिक्के देखील बनावट असून, नोकरी शोधत असलेल्या लोकांनी अशा भामट्यांपासून सावध राहायला हवे.

या प्रकरणी मुंबईतील गोवंडी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी संबंधित ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांना देखील आपण बोलणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.