भाजपाने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी ठरवून बदनाम केले – नाना पटोले

मुंबई : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यापासून वंचित, दलित, शोषित समाज घटकांवरचे अत्याचार वाढले आहेत. या मनुवादी विचाराच्या सरकारने आंबेडकरी चळवळीला नक्षलवादी चळवळ ठरवून बदनाम करण्याचे पाप केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व आंबेडकरी चळवळ संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यवस्थेला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. टिळक भवन येथे पार पडलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी बोलताना पटोले म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणले. देश बाबासाहेबांच्या संविधानावर चालतो पण हे संविधानच बदलण्याचे काम सुरु आहे. सर्व काही खाजगीकरण करुन आरक्षण संपुष्टात आणले जात आहे. असा घणाघात पटोले यांनी केला आहे

शेतकरी, कामगार, तरुण वर्गाला संपवण्याचे काम केले जात आहे. बाबासाहेबांचा विचार टिकला तरच देश वाचेल त्यासाठी आंबेडकरांचा विचार, काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवा. देशात परिवर्तन घडेल तर ते महाराष्ट्रातूनच आणि हे परिवर्तन घडवण्यासाठी जोमाने काम करा, असे आवाहन पटोले यांनी केले.